कोरोना महामारी : ‘सकाळ’ची भूमिका

कोरोना महामारी : ‘सकाळ’ची भूमिका

पुण्यात कोरोना विषाणूचा सलग दुसऱ्या वर्षी उद्रेक झालेला आपण बघतोय. यंदा संसर्गाची व्याप्ती मोठी आहे. या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधीतांची दमछाक होताना स्पष्ट दिसतेय. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करायचे तर ‘आयसोलेशन बेड’ नाही; व्हेंटिलेटर दूरच; पण ऑक्सिजन बेडचीही वानवा आहे. विद्येच्या माहेरघरातून विद्यार्थी परत फिरले, अर्थचक्राला गती देणाऱ्या महानगरातील कामगारांनी गावचा रस्ता धरला. सांस्कृतिक राजधानीतील रस्त्यांवर शुकशुकाट झाला.

हीच वेळ आहे स्वतःला सावरण्याची. परिस्थितीला तोंड देण्यासाठी पाय रोवून उभे राहण्याची. हीच वेळ आहे, विस्कटू पाहणारं पुणं पुन्हा गतिमान करण्यासाठी सहकार्य करण्याची. सरकार, प्रशासन आणि नागरी संघटना, उद्योजक-व्यापाऱ्यांनी एकत्र विचार करून सर्वसामान्य नागरिकांसाठी ठोस मदत उभी करण्याची. रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी दाही दिशांना शोधाशोध सुरू आहे. प्लाझ्मा मिळण्यासाठी रक्तपेढीचे दरवाजे ठोठावले जात आहेत. व्हेंटिलेटरसाठी एकामधून दुसऱ्या रुग्णालयांमध्ये पळापळ सुरू आहे. अशा परिस्थितीत गरज आहे ती सूसूत्रतेची. प्रशासन, रुग्णालये, सामाजिक-राजकीय नेतृत्व असे प्रत्येकजण काही ना काही प्रयत्न जरूर करीत आहेत; पण उपलब्ध पायाभूत सुविधा त्रोटक ठरत आहेत. अशावेळी काय करायला पाहिजे...?

१. नागरिक, संस्था, संघटना, स्वयंसेवी संस्था यांनी आरोग्याच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर भर देण्याची गरज आहे.

२. वैद्यकीय महाविद्यालये, वेगवेगळ्या वैद्यकीय संघटना, वेगवेगळ्या प्रशासकीय कामात गुंतलेले सरकारी डॉक्टर, लष्करातील वैद्यकीय अधिकारी या सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. सरकारी आणि खासगी डॉक्टरांची गेल्या वर्षभरापासून रुग्णसेवेने दमछाक झाली आहे. आता ताज्या दमाची लष्करी वैद्यकीय पलटण काही दिवसांपुरती सरकारी रुग्णालयांमध्ये आणली पाहिजे.

३. पुरेसा ऑक्सिजन मिळाला नाही, त्यामुळे रुग्णाचे प्राण गेले, अशी स्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी आतापासूनच घेतली पाहिजे. वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी, त्याची उत्पादन क्षमता आणि पुरवठा याचे त्रैराशिक अचूक असलेच पाहिजे.

४. सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टरांना फक्त कोरोना उपचारांवर लक्ष केंद्रित करणे शक्य आहे. त्यासाठी रुग्णालयातील पायाभूत सुविधांमध्ये योग्य तो बदल करता येईल. कोरोना व्यवस्थापनाचे सुकाणू सरकारी डॉक्टरांनी स्वतःकडे घेणे ही आजची गरज आहे.

५. लालफितीचे नियम बाजूला ठेवून सरकार, प्रशासनाने नागरी संघटना, उद्योजक-व्यापारी संघटनांचा मदतीचा हात हाती घेतला पाहिजे. कोविड सेंटर निर्माण करण्यासाठी अधिकाधिक खासगी सहभाग घेण्याची गरज आहे; त्यासाठी सरकारी यंत्रणेने जबाबदारी घेतली पाहिजे आणि तशी सेंटर्स उभी केली पाहिजेत.

६. बेड मिळावा, म्हणून असंख्य रुग्णांचे नातेवाईक रस्त्यांवर फिरत आहेत. त्यांच्या रुग्णांना योग्य शास्त्रीय पद्धतीने उपचार देण्याची व्यवस्था करण्यासाठी शहरातील नागरी संघटना-संस्थांनी पुढे आले पाहिजे. ही वेळपण थांबणार नाही. ती नक्की निघून जाईल. पण, अशा बिकट प्रसंगी मदतीला धावलेली माणसे नेमकी आयुष्यभर लक्षात राहतील.

आम्हाला जरूर कळवा
‘कोविड १९’ने उभ्या केलेल्या नव्या आव्हानांचा मुकाबला करायचाच आहे. तुमच्या काही सूचना, सल्ला, मदतीचे प्रस्ताव असतील, तर आम्हाला जरूर कळवा.
editor@esakal.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com