'भाजप भरकटलाय, पक्षाला समुपदेशनाची गरज'; सामनातून टीका

criticism on BJP through today Samna Editorial by Shivsena
criticism on BJP through today Samna Editorial by Shivsena

मुंबई : सत्तासंघर्षांनतर महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर विरोधी पक्षाला वाटत होते की सरकार पडेल व पुन्हा भाजप सत्तेच येईल. मुंबईत जेएनयुमधील हिंसाचारानंतर मेहक प्रभू या युवतीने 'फ्रि काश्मीर'चे पोस्टर हातात उंचावले होते. यावरही कोणता विचार न करता विरोधी पक्षाने थेट सरकारवर टीका केली होती. नंतर मेहकने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर त्यांचा भ्रमनिरस झाला. विरोधी पक्षाने असे वागणे बरे नाही. त्यांनी विश्वासार्हता, प्रतिष्ठा गमावणे हे महाराष्ट्राला चालणार नाही. आम्ही विरोधी पक्षाचा विचार करतो, आम्हाला त्यांची काळजी आहे व भाजपला समुपदेशनाची गरज आहे, असा टोला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामन्यातून लगावला आहे.

एखाद्या पक्षाची इतकी बेइज्जती आम्ही गेल्या 50 वर्षांत बघितली नाही. विरोधी पक्ष दररोज स्वतःचे हसू करून घेत आहेत. विरोधी पक्षाला इतकी गळती लागणे बरोबर नाही. असेही अग्रलेखात म्हणले आहे. फडणवीसांना जेव्हापासून विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत जावे लागले तेव्हापासून भाजप भरकटला आहे. लोकशाहीसाठी एक भक्कम विरोधी पक्ष असणे गरजेचे असते, मात्र भाजरपची ही स्थिती चांगली नाही, असेही सामन्याच्या अग्रलेखात म्हणले आहे. 

असा आहे आजचा सामनाचा अग्रलेख...
फडणवीस सत्ताधाऱ्यांवर रोज एक भंपक, बिनबुडाचा आरोप करतात व नंतर तोंडावर आपटतात याचे आमच्याइतके वाईट कुणालाच वाटत नसेल. नागरिकता सुधारणा कायदा व ‘जेएनयू’तील निर्घृण हल्ला प्रकरणानंतर देशभरातील तरुण वर्ग संतापून रस्त्यावर उतरला आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियासमोर तरुणांनी आंदोलन, धरणे वगैरे धरली. त्यात एका मुलीच्या हातात ‘फ्री कश्मीर’ असा कागदी फलक घेतलेला फोटो प्रसिद्ध झाला. यावर विरोधी पक्षनेत्यांना धक्का बसला. त्यांच्यातला राष्ट्रभक्त उसळला व त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सरकारलाच धारेवर धरले. काय तर म्हणे, ‘‘पहा, पहा, उद्धव ठाकरे यांच्या नाकासमोर कश्मीरातून फुटून निघण्याचे फलक नाचवले जात आहेत. हा देशद्रोह मुख्यमंत्री ठाकरे यांना मान्य आहे काय?’’ वगैरे वगैरे वगैरे. विरोधी पक्षनेत्यांच्या सुरात सूर मिसळण्यास इतर भगतगणही पुढे आले, पण त्यांचा हा आरोप म्हणजे भंपकपणाचा कळसच ठरला.

ज्या मुलीने ‘फ्री कश्मीर’चा फलक झळकवला ती मुलगीच तासाभरात वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्यासमोर आली व तिने विरोधी पक्षाच्या ढोंगाचा बुरखाच फाडला. मुळात ही मुलगी मुसलमान किंवा कश्मिरी नव्हती. शुद्ध मराठीत तिने आपले नाव मेहक प्रभू असे सांगितले. त्यामुळे पहिल्या फटक्यातच भगतगण कोलमडले. मेहक असे म्हणाली की, ‘जेएनयूतील विद्यार्थ्यांवरील हल्ले पाहून मी अस्वस्थ झाले व एका कर्तव्यभावनेने गेट वे ऑफ इंडियासमोरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. ही माझी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. आंदोलनाच्या ठिकाणी अनेक फलक पडले होते. त्यातला एक फलक उचलून मी कॅमेऱयासमोर झळकवला. त्यावर ‘फ्री कश्मीर’चा उल्लेख होता. माझ्या दृष्टीने ‘फ्री कश्मीर’ म्हणजे देशातून फुटून निघणे असा होत नाही, तर आज कश्मीरच्या नागरिकांवर जी बंधने लादली आहेत, त्यांना देशापासून तोडले आहे.

कश्मिरी जनतेची वेदना एका मुंबईकर मराठी मुलीने मूकपणे मांडली. यावर विरोधी पक्ष म्हणतो हा देशद्रोहच आहे. विरोधी पक्षाच्या बेजबाबदारपणाचे यापेक्षा घाणेरडे उदाहरण दुसरे नसेल. देशाचा जो नागरिक निर्भयपणे भावना व्यक्त करील तो देशद्रोही, असा प्रचार मोदी-शहांचे भगतगण करीत असतील तर ते स्वतःबरोबरच देशासाठी खड्डा खणत आहेत. फडणवीस यांच्या काळजात घुसलेला बाण व त्यानंतरची वेदना आम्ही समजू शकतो. तरीही त्यांनी त्या वेदनेवर संयमाचा बाम चोळून काही काळ शांत राहायला हवे. त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, असे भन्नाट आरोप करून ‘ठाकरे सरकार’ पडणार नाही. उलट तीन पक्ष अधिक घट्ट होतील. हे सर्व करण्यापेक्षा त्यांनी ‘विरोधी पक्षाची जबाबदारी व कर्तव्य’ अशा विषयांवर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये मार्गदर्शन शिबीर आयोजित करून त्यात सहभागी व्हायला हवे. ज्याला ‘कौन्सिलिंग’ म्हणतात अशा समुपदेशनाची आज विरोधी पक्षाला गरज आहे; कारण रोज त्यांना वाटते की, सरकार पडेल व आपण पुन्हा येऊ!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com