
'मुख्यमंत्री आम्हाला भेटत नाहीत; पण अजितदादांना पहाटे ५ वाजता फोन केल्यावर...'
महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकांमध्ये भाजपने सरशी केल्यानंतर महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे. त्याच मविआतील सर्व पक्षांचे उमेदवार विजयी झाले, मात्र संजय पवारांचा पराभव सेनेच्या जिव्हारी लागला आहे. निवडणुकीचा निकाल येताच संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांची नावं घेऊन त्यांनीच ही गेम केल्याच म्हटलं. तर, राष्ट्रवादीचे आमदार देवेंद्र भुयार यांच्यावरी टीका केली. (MLA Devendra Bhuyar Meets Sharad Pawar)
त्यामुळे, देवेंद्र भुयार यांनी राग व्यक्त करत अगोदर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यांची अजित पवारांसोबतही चर्चा झाली. यानंतर भुयार यांनी हॉटेल ग्रँड हयात येथे जाऊन संजय राऊत यांचीही भेट घेतली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्हाला वेळ देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी अजित पवारांवर स्तुतीसुमनं उधळली. (Ajit Pawar News)

आमदार भुयार मुंबईत संजय राऊत यांनाही भेटले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत भुयारांनी प्रश्न उपस्थित केले. शिवसेनेतील काही नेते आम्हाला मुख्यमत्र्यांपर्यंत पोहोचून देत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे झारीतील शुक्राचार्य ओळखले पाहिजेत, असा सल्ला भुयारांनी दिलाय. मतांचा विषय संपला की अपक्ष आमदारांकडे कोणीही लक्ष्य देत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.
मुख्यमंत्र्यांना अनेकदा विकासकामांच्या निधीसाठी भेट घ्यायची असल्यास ते वेळ देत नाहीत. मतदारसंघातील कामं करण्यासाठी निधी लागतो. मात्र मुख्यमंत्री भेटायलाच वेळ देत नसल्याने कामं मार्गी लागत नाहीत. आम्हाला केवळ एकच आधार आहे, तो म्हणजे मंत्रालयाचा सहावा माळा, अजित पवार! अपक्ष आमदार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही, ही गोष्ट मी संजय राऊत यांनाही बोलून दाखवली होती. त्यांनीदेखील ही बाब कबूल केल्याचे देवेंद्र भुयार यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांची वेळ मागूनही मिळत नाही. आज मी अजित पवारांना पहाटे 5 वाजता फोन केला होता. दादांनी लगेच ७.४५ ला वेळ दिली आणि भेटयला बोलावलं, असं भुयार म्हणाले.
पवारांनी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी वागलं पाहिजे - भुयार
मी महाविकास आघाडीचा घटक आहे आणि राहीन. आगामी विधान परिषद निवडणुकीत याचा परिणाम होणार नाही. आम्हाला मुख्यंमत्री भेटत नाही हे खरेच आहे. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. राज्यातील सर्व अपक्ष आमदारांची २० तारखेआधी भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचं आवाहन पवारांनी केलं आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे, असं भुयार म्हणाले. आम्ही जनतेची कामे सांगतो, वैयक्तिक कामासाठी निधी मागत नाही, असंही भुयार यांनी म्हटलंय.
Web Title: Devendra Bhuyar Speaks Meets Ajit Pawar Over Rajyasabha Election 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..