देवेंद्र फडणवीस सरकारचा आज शेवटचा अर्थसंकल्प

मुंबई - अर्थसंकल्पावर शेवटचा हात फिरविताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राज्यमंत्री दीपक केसरकर.
मुंबई - अर्थसंकल्पावर शेवटचा हात फिरविताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राज्यमंत्री दीपक केसरकर.

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (ता. १८) विधिमंडळात सादर होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लोकप्रिय घोषणा करून विविध घटकांना खूश करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल.

उद्या दुपारी दोन वाजता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत २०१९-२० या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होईल. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तर विधान परिषदेत अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर अर्थसंकल्प मांडतील. या पार्श्वभूमीवर दोनही मंत्र्यांनी सोमवारी अतिरिक्त अर्थसंकल्पावर शेवटचा हात फिरवला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने २८ फेब्रुवारी रोजी हंगामी अर्थसंकल्प सादर केला होता. हंगामी अर्थसंकल्पात १ एप्रिल ते ३१ जुलै २०१९ अशा चार महिन्यांसाठी लागणाऱ्या आवश्‍यक खर्चाची तरतूद करण्यात आली होती. याशिवाय हंगामी अर्थसंकल्पात कृषी, सिंचन, आरोग्य, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांना भरभक्कम निधी देण्यात आला होता. मात्र, सरकारने त्या वेळी लोकप्रिय घोषणा करण्याचे टाळले होते.

येत्या ऑक्‍टोबर महिन्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शेतकरी, कामगार तसेच विविध सामाजिक समूहांना खूश करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. सरकारने शेतकऱ्याचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले आहे. तरीही सरसकट कर्जमाफीची मागणी पुढे येत आहे. ही मागणी सरकारच्या विचाराधीन असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले होते. त्यामुळे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा होऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com