सेलू (जि. परभणी) - शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेवटच्या शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफी योजना सुरूच ठेवली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. शेतकऱ्यांना बुडवणाऱ्या विमा कंपन्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
महाजनादेश यात्रेनिमित्त आज येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. चार वर्षांपासून मराठवाड्यात सतत दुष्काळ पडत आहे. समुद्रात वाहून जाणारे कोकणातील पाणी "वॉटरग्रीड'च्या माध्यमातून मराठवाड्यातील धरणांत सोडणार आहे. त्यातून पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटेल. मराठवाड्याला पुन्हा दुष्काळ पाहू देणार नाही, अशी ग्वाही देत ते म्हणाले, ""येथे आल्यावर लोकांचा महापूर पाहायला मिळाला. विरोधी पक्षात असताना संघर्ष यात्रा काढत होतो. सत्तेत आल्यावर महाजनादेश यात्रा काढून पाच वर्षांत केलेल्या कामाचा लेखा-जोखा जनतेसमोर मांडत आहोत. जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी यात्रा आहे. विरोधक "ईव्हीएम' यंत्रावर बोलत आहेत. "बिघाड ईव्हीएम'मध्ये नव्हे तर विरोधकांच्या डोक्यात आहे.''
मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी प्रास्ताविक केले. सुभाष मोहकरे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी जिंतूर- सेलू मतदारसंघातील नागरिक मोठ्य संख्येने उपस्थित होते.
"मनसे'ने दाखविले काळे झेंडे
मंठा (जि. जालना) येथून महाजनादेश यात्रा येत असताना सेलू शहराजवळील इंद्रायणी हॉटेलजवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुखमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविले. मंठा पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अटक करून त्यांच्याजवळील मोबाईल ताब्यात घेतले.
ठिकठिकाणी सभा, स्वागत
- पाथरी, परभणी येथे सभा, मानवतला स्वागत
- सेलूत नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचा भाजप प्रवेश
- परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नजर कैदेत ठेवले.
- पाथरीच्या सभेत शेतकऱ्यांचा पीकविमा प्रश्नावरून गोंधळ, काही जण ताब्यात
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.