सोलापूर : लॉकडाऊन वाढल्याने आणि राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, आगामी शैक्षणिक वर्षातील शाळांचे वेळापत्रक कोलमडले आहे. दर आठवड्यात 48 तासांचा अभ्यासक्रम पूर्ण होणार नसल्याने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अनावश्यक अभ्यासक्रम कमी केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणार नसल्याने एसएससी बोर्डाने आगामी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करावा, असे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाने काढले आहे. तर शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रम पूर्ण व्हावा या हेतूने दिवाळीसह अन्य सुट्ट्या कमी कराव्यात, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.
देशातील कोरोनाचे वैश्विक संकट हद्दपार करण्यासाठी केंद्र सरकारने 22 मार्चपासून 30 जूनपर्यंत पाच टप्प्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला. यामुळे दहावीच्या भूगोल विषयाचा पेपर रद्द करावा लागला तर उत्तरपत्रिका अडकून पडल्याने निकालासही विलंब लागला आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून राज्यातील रुग्णांची संख्या 68 हजारांवर पोचली आहे. नंदूरबार, चंद्रपूर, वाशीम व वर्धा हे चार जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्र रेड झोनमध्येच आहे. दरम्यान, यंदाचे शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू करण्याचे ठरले असले तरीही, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्यक्षात वर्ग भरण्याबाबत संभ्रम कायम आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मिळणारा कमी वेळ, स्कूल बस तथा ऑटोरिक्षा वाहतुकीस बंदी तर गर्दी टाळण्यासाठी तीन सत्रांमध्ये अथवा इयत्तानुसार वर्ग भरण्याचे केलेले नियोजन, या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी दिवाळी सह अन्य सुट्ट्या कमी केल्या जाणार आहेत. दरम्यान, हे गोपनिय परिपत्रक असून याबाबत शिक्षण विभाग लवकरच माहिती जाहीर करेल, असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार...
भाषा, गणित, विज्ञान विषयांना राहणार प्राधान्य
कोरोना या विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग प्रत्यक्षात कधी भरतील, हे अद्यापही अनिश्चितच आहे. या पार्श्वभूमीवर आकाशवाणी तथा स्थानिक केबल नेटवर्क चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन शिक्षणाचे धडे देण्याचे नियोजन आहे. रेड झोन वगळता ज्या भागांमध्ये मागील 15 दिवसांत एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही, अशा भागातील शाळा व्यवस्थापन समिती व ग्राम सुरक्षा दलाच्या अभिप्रायानुसार तेथील शाळा भरविल्या जाणार आहेत. मात्र, सद्यस्थिती पाहता भाषा, विज्ञान व गणित या विषयांना प्राधान्य द्यावे तर उर्वरित विषयांचे विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययन करावे, असेही शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.