परमबीर सिंग प्रकरणी पवारांना फडणवीसांचं प्रत्युत्तर; पत्रकार परिषदेतील १० महत्वाचे मुद्दे

fadnvis
fadnvis

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारं सविस्तर आठ पानी पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. या पत्रावरुन राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. विरोधीपक्षांनी यावरुन राळ उडवल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक शरद पवार यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली आणि यावर स्पष्टीकरण दिले. मात्र, शरद पवारांनी सांगितलेले मुद्दे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोडून काढले आहेत. त्यासाठी फडणवीसांनीही पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदत त्यांनी मांडलेल्या १० महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात.

पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, 

  1. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी काल एक पत्र लिहिलं. पण, अशा प्रकारे एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं लिहिलेलं हे पत्र नाही. यापूर्वी तत्कालीन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी एक अहवाल राज्य सरकारला सादर केला होता.
     
  2. तेव्हाच्या पोलीस आयुक्त, गुप्तवार्ता यांच्याकडून हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता. त्यांच्याकडून तो गृहमंत्र्यांकडे गेला. सुबोध जयस्वाल यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी पोलिस महासंचालकसारखे प्रतिष्ठेचे पद सोडण्याचे कारणच हे होते, कारण भ्रष्टाचाराबाबत शासन गंभीर नव्हते.
     
  3. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार काही फोन कॉल्सवर नजर ठेवण्यात आली होती. त्यातून फारच गंभीर प्रकार समोर आले. यामध्ये बदल्यांचे एक मोठे रॅकेट आढळून आले. सुबोध जयस्वाल यांची तर बदली होणार नव्हती, त्यामुळे ते कंटाळून सोडून गेले.
     
  4. परमबीर सिंग यांच्याच कमिटीने वाझे यांना नोकरीत घेतले. पण, मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या निर्देशाने, आशीर्वादाने त्यांनी हे काम केले, हे सांगायला शरद पवार विसरले.
     
  5. परमबीर सिंग यांच्या पत्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांना माहिती दिल्याचे सांगितले आहे. मग मुख्यमंत्री यावर का बोलत नाहीत? परमबीर सिंग यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करणार असाल तर ते पापांवर पांघरूण घालण्यासारखे आहे. 
     
  6. गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय, याची चौकशी होऊच शकत नाही. गृहखाते कोण चालविते? अनिल देशमुख की अनिल परब? कारण, सभागृहात गृहविभागावर उत्तरं सभागृहात अनिल परब देतात. या नियुक्त्यांमध्ये नेमका हस्तक्षेप कुणाचा, हे स्पष्ट झालेच पाहिजे.
     
  7. सचिन वाझे जितक्या गाड्या वापरत होते, त्यापैकी काही गाड्या नेमके कोण-कोण व्यक्ती वापरत होते, हेही स्पष्ट झाले पाहिजे. एनआयए किंवा अन्य तपास यंत्रणांनी याची माहिती जनतेला दिली पाहिजे.
     
  8. ही दलाली आणि लाचखोरी तेव्हाच थांबविली गेली असती, तर आज हा प्रसंग आला नसता. माझ्या माहितीप्रमाणे या दलालीचा संपूर्ण रिपोर्ट सरकारच्या रेकॉर्डवर इनवर्ड झालेला आहे.
     
  9. ज्युलिओ रिबेरो हे अनुभवी आणि अतिशय चांगली व्यक्ती आहेत. ते केवळ परमबीर सिंग यांचीच चौकशी करणार की गृहमंत्र्यांची सुद्धा? थोडक्यात विद्यमान गृहमंत्र्यांची चौकशी १५-२० वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या पोलीस अधिकार्‍यांनी करावी, असे शरद पवार यांना सूचवायचे आहे का?
     
  10. अनिल देशमुख यांचा राजीनामा आलाच पाहिजे. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्यांचा राजीनामा आल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचे आंदोलन थांबणार नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com