पारध : गेल्या वर्षीपासून तीनही ऋतूत पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतशिवाराला सतत फटका बसत असल्याने शेतकरी या बेमोसमी पावसाळ्याला वैतागले आहेत. गेल्या वर्षी खरीप हंगामात ऐन पिके काढणीच्या काळात परतीच्या पावसाने मोठी हजेरी लावली होती. त्यामुळे सोयाबीनची माती, तर कापसाच्या वाती झाल्या होत्या. शिवाय इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेला आहे. यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने रब्बी हंगामात गहू, हरभरा, कांदा, ज्वारी, मका आदी पिकांची पेरणी केली होती. परंतु येथेही शेतकऱ्यांचे नशीब आड आले.
रब्बी पिकांनाही बेमोसमी पाऊस, गारपिटीचा फटका बसला. उन्हाळी पिकांनाही फटका बसत आहे. फळबागांची दैना होत आहे. याआधीही शासनाकडून पिकांचे पंचनामे करण्यात आले. परंतु अद्याप अनेकांपर्यंत मदत पोचलेली नाही. पाऊस आताच पडून घेत असल्यामुळे आगामी पावसाळा कसा जाणार अशी चिंता शेतकऱ्यांना आहे. पावसाळ्यात शेतकऱ्यांचे नशीब उजाडणार का? अशी चिंता सर्वांना लागली आहे.
पारध परिसरात बाराही महिने बेमोसमी वादळवाऱ्यासह पाऊस पडत असल्यामुळे पावसाळा बाराही महिने असल्याचे चित्र निर्माण झाले. यंदाच्या पावसाळ्यात पाऊस पडेल की नाही अशी धास्ती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
— सागर श्रीवास्तव, शेतकरी, पारध
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.