सकाळी साडेदहा वाजता असेल दहावी-बारावीचा पहिला पेपर ! "या' दिवसापासून मिळेल हॉल तिकीट

Students_Exam
Students_Exam

सोलापूर : बारावीच्या 14 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा 23 एप्रिलपासून तर दहावीतील 16 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा 29 एप्रिलपासून सुरू होणार आहे. 7 एप्रिल रोजी पुणे बोर्डाकडून शाळांना परीक्षेचे प्रवेशपत्र वितरीत केले जातील. 10 एप्रिलपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून ते घेऊन जावे लागणार आहे. यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांना वाढीव वेळ दिल्याने पहिला पेपर सकाळी साडेदहा वाजता तर दुसरा पेपर दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे. 

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक अंतिम केले आहे. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सोलापूर, जळगाव, नागपूर, पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद, बीड, जालना, मुंबई, ठाणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांमधील काही पालकांनी परीक्षा ऑनलाइन घ्यावी अथवा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. पुणे बोर्डाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत परीक्षा केंद्रे वाढविण्याचा निर्णय घेतला आणि विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार ते शिकत असलेल्या शाळांमध्येच परीक्षा होईल, असे नियोजन केले. विद्यार्थ्यांच्या मनात कोरोनाची भीती असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी 30 मिनिटांचा अतिरिक्‍त वेळही वाढवून देण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे जे विद्यार्थी नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांची 15 जूनपर्यंत स्वतंत्र परीक्षा घेतली जाणार आहे. 

पुढच्या वर्षी ऑनलाइन प्रवेशपत्र 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर आगामी वर्षात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना घरबसल्या त्यांचे परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याची माहिती पुणे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. दरवर्षी दहावी - बारावीसाठी सुमारे 30 ते 32 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. प्रवेशपत्र घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांना हेलपाटे मारावे लागतात. या पार्श्‍वभूमीवर आगामी वर्षात पुणे बोर्डाकडून स्वतंत्र वेबसाईट (संकेतस्थळ) सुरू करून त्यावरून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र (हॉल तिकीट) काढून घेता येणार असल्याचेही ते म्हणाले. 

दोन सत्रात होईल परीक्षा 
उन्हाचा तडाखा आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव या पार्श्‍वभूमीवर दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दोन सत्रांत घेतली जाणार आहे. पहिला पेपर सकाळी साडेदहा ते दोन वाजता होईल. दुसऱ्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा पेपर दुसऱ्या टप्प्यात दुपारी अडीच ते सहा वाजेपर्यंत घेतला जाणार आहे. परीक्षार्थींना मास्क बंधनकारक केला जाणार असून त्यांना पेपर सुरू होण्याच्या पाऊण तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहतील, अशी व्यवस्था करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा - महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक - प्राचार्यांना दिल्या आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com