.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोलापूर : अचानक येणारी नैसर्गिक आपत्ती, नवनवीन रोग, किडीचा प्रादुर्भाव, पाण्याचे दुर्भिक्ष, वेळेत तज्ज्ञांचा न मिळणारा सल्ला, अशा बाबींमुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत आहेत. त्यामुळे राज्यात दररोज सरासरी सहा ते सात शेतकरी आत्महत्या होत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा पैसा, श्रम व वेळेची बचत व्हावी म्हणून १ जूनपासून शेती क्षेत्रात ‘एआय’चा वापर केला जाणार आहे. राज्यातील सव्वा कोटी शेतकऱ्यांना आता प्रत्येक बाबींवर अचूक सल्ला मिळणार आहे.
शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन, सल्ला मिळाल्यास त्यांचे नुकसान कमी होईल. त्यांचे श्रम, वेळ व पैसा बचत होईल, या उद्देशाने राज्य सरकारने आता शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यातून शेतकऱ्यांना माती परीक्षणापासून पिकांची लागवड ते पीक निघून बाजारपेठेत नेईपर्यंतची माहिती दिली जाणार आहे. हवामान अंदाज व घ्यायची खबरदारी, कीड, रोग नियंत्रण, असे पीक सल्ले एकत्रितपणे सर्व शेतकऱ्यांना दिले जातील. त्यासाठी जिल्हा ते सर्कल स्तरापर्यंतचा शेतकऱ्यांचा डेटा कृषी विभागाने संकलित केला आहे.
ई-पीक पहाणीवरून पिकांची क्षेत्रनिहाय माहिती देखील कृषी विभागाकडे असणार आहे. त्यामुळे प्रत्येक भागातील शेतकऱ्यांना अचूक सल्ला ‘एआय’कडून दररोज दिला जाणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाकडून त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी या तंत्रज्ञानाचा वापर सुरू होईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
‘या’ प्रमुख बाबींवर दररोज सल्ला
रोग, किडीच्या नियंत्रणासाठी कोणती औषधे फवारायची यावर माहिती
कोणत्या पिकांना कोणत्यावेळी किती पाणी द्यायचे, यावर सल्ला
पीकनिहाय कोणकोणत्या खतांचा डोस किती प्रमाणात द्यावा
हवामान बदलाची माहिती देऊन त्यावेळी काय खबरदारी घ्यायची, यावर माहिती
शेतकऱ्यांसाठी केंद्राची ‘विस्तार’ प्रणाली
राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा विविध भागातील शेतकऱ्यांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत. त्यांना त्यांच्याच भाषेत अडचणी, प्रश्न विचारता येतील आणि त्याच भाषेत त्यांना उत्तरे मिळतील, अशी विस्तार प्रणाली केंद्र सरकारकडून तयारी केली जात आहे. त्यासाठी ‘व्हाइस’चा पर्याय उपलब्ध असणार आहे. अशिक्षित शेतकरीसुद्धा त्यांच्या बोलीभाषेतून प्रश्न विचारू शकणार आहे.
शेतकऱ्यांची माहिती कृषी विभागाकडे...
पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी ‘एआय’चा वापर सुरू केला जाणार आहे. त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान कमी होऊन त्यांचे श्रम, पैसा व वेळेची बचत होईल. शेतकऱ्यांची संपूर्ण पीकनिहाय माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध आहे.
- गिरीश कुलकर्णी, उपसंचालक, कृषी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.