विधी व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर! प्रथम वर्षाचे निम्मे विषय राहिले, तरी मिळणार तृतीय वर्षाला प्रवेश; विद्या परिषदेची आज बैठक

प्रथम वर्षाचा अनुत्तीर्ण विद्यार्थी द्वितीय वर्षातील सर्व विषयात उत्तीर्ण झाल्यास त्याला तिसऱ्या वर्षात प्रवेश दिला जाणार आहे. पण पहिल्या वर्षातील ५० टक्के विषयात तो उत्तीर्ण असणे बंधनकारक असणार आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय आज विद्या परिषदेच्या बैठकीत होणार आहे.
sakal exclusive
sakal exclusiveSAKAL

सोलापूर : प्रथम वर्षाचे काही विषय अनुत्तीर्ण राहिलेला विद्यार्थी द्वितीय वर्षातील सर्व विषयात उत्तीर्ण झाल्यास त्याला तिसऱ्या वर्षात प्रवेश दिला जाणार आहे. पण, पहिल्या वर्षातील किमान ५० टक्के विषयात तो उत्तीर्ण असणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, यासंदर्भातील अंतिम निर्णय उद्या (सोमवारी) विद्यापीठात होणाऱ्या विद्या परिषदेच्या बैठकीत होणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित १०८ महाविद्यालये आहेत. त्यात अभियांत्रिकीचे सात आणि विधीचे तीन महाविद्यालये आहेत. कोरोनानंतर अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यावेळी कोरोनात ऑनलाइन परीक्षा पार पडल्या, पण आता ऑफलाइन परीक्षा द्याव्या लागत आहेत.

या पार्श्वभूमीवर, प्रयास मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांनी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ‘कॅरीऑन’चा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यापूर्वीच विद्यापीठाकडे केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यासंदर्भात ६ सप्टेंबरला निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने निर्णय घ्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

त्यासंदर्भात विद्या परिषदेत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला जाणार आहे. अभियांत्रिकीसह विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठीही तोच निर्णय लागू असणार आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या अभ्यासक्रमात त्यासंदर्भात स्पष्टपणे काहीच नमूद नसल्याने आता विद्यापीठाकडून ‘कॅरीऑन’चा निर्णय होणार आहे.

‘कॅरीऑन’ म्हणजे नेमके काय?

विधी किंवा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाचा एखादा विद्यार्थी प्रथम वर्षात अनुत्तीर्ण आहे, पण त्याचे पुढील वर्षातील सर्वच विषय निघाले (उत्तीर्ण) आहेत. अशावेळी प्रथम वर्षातील विषय उत्तीर्ण झाल्याशिवाय त्या विद्यार्थ्याला पुढच्या वर्षात प्रवेश घेता येत नाही ही सद्य:स्थिती आहे. पण, आता ‘कॅरीऑन’चा निर्णय झाल्यावर तो विद्यार्थी प्रथम वर्षातील ५० टक्के विषयात अनुत्तीर्ण असला आणि द्वितीय वर्षात तो सर्वच विषय उत्तीर्ण झालेला असल्यास त्यास तृतीय (पुढील वर्ष) वर्षाला प्रवेश मिळणार आहे. पण, पदवी पूर्ण होताना तो मागील सर्वच विषयात उत्तीर्ण असावा लागणार आहे. त्याशिवाय त्याला पदवीचे प्रमाणपत्र मिळणार नाही तथा त्याची पदवी पूर्ण होणार नाही.

विद्यार्थी वाढविलेल्या महाविद्यालयांसाठी समिती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित जवळपास २० ते २२ महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या मान्यतेशिवाय प्रवेश क्षमता वाढविली आहे. नैसर्गिक वाढ दरवर्षी दहा टक्के मान्य असतानाही काही महाविद्यालयांनी तब्बल ६० ते ९० टक्के विद्यार्थी वाढविले आहेत. एका महाविद्यालयाने तर तब्बल ११० टक्के प्रवेश क्षमता वाढविली आहे. त्यातील बहुतेक महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन देखील करून घेतलेले नाही. आता या महाविद्यालयांमधील उपलब्ध भौतिक सुविधा, संगणक, लॅब व ग्रंथालय बैठक व्यवस्था पडताळली जाणार आहे. त्यासाठी कुलगुरुंच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र समिती नेमली जाणार आहे. त्यानुसार संबंधित महाविद्यालयांवर कारवाई केली जाणार असून त्यासंबंधीचाही निर्णय विद्या परिषदेच्या बैठकीत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com