
Narayan Rane : भाजपमध्ये आल्याने अडचणीत आलो; फडणवीसांसमोरच नारायण राणेंचं विधान
सिंधुदुर्गः आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी नारायण राणे यांनी एक विधान केल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
यावेळी बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुढचा आमदार आणि खासदार आपलाच होईल. त्याचबरोबर चिपी विमानतळाच श्रेय नारायण राणे यांना दिलं पाहिजे. भराडीदेवीने आम्हाला कौल दिल्याने आम्ही सत्तेत आलो आहोत.
उद्धव ठाकरेंनी कोकणासाठी काहीही केलं नाही. कोकणासाठी राणेंनी काय केलं ते सर्वांनी पहिलं. आपण रस्ते, वाहतूक, मूलभूत सुविधा आपल्या काळात आणल्या. त्यांनी काही केलं नाही. त्यांचं प्रेम बेगडी आहे. त्यांनी रिफायनरीला विरोध केला असं फडणवीस म्हणाले.
त्यानंतर बोलतांना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, शिवसेना खरी वाढली कोकणामधून. आम्ही शिवसेनेसाठी कष्ट उपसले. उद्धव ठाकरेंनी काय केलं? असा सवाल उपस्थित करुन राणे म्हणाले की, त्यांनी साधी अंगणवाडी बांधली नाही. कोकणामध्ये आलेल्या प्रत्येक प्रकल्पाला मात्र विरोध केला.
'माझ्यावर टीका केली जात आहे. मी सहन करतोय तोपर्यंत ठीकय. एकदा का मी बोलायला लागलो तर सगळंच बाहेर काढेन. त्यांना इथं राहताही येणार नाही. मी भाजपमध्ये आलो हीच अडचण झाली. कारण इथं सहनशील आणि शांत विचारसरणीचे लोक आहेत. त्यामुळे आपणंही तसं दाखवायला पाहिजे म्हणून शांत आहे' असं म्हटल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या.