
Swachh Bharat Mission : केंद्राच्या वार्षिक सर्वेक्षणात इंदूरला सलग सहाव्यांदा सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर, सुरत, नवी मुंबई या शहरांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे. आठ वर्षांपूर्वी स्वच्छतेच्या क्रमवारीत इंदूरचा क्रमांक 200 च्या खाली होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज दुपारी 4 वाजता स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ शहरांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. मोठ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेशला पहिले स्थान देण्यात आले आहे. तर, छोट्या राज्यांमध्ये त्रिपुरा पहिल्या क्रमांकावर आहे. यावेळी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी इंदूर मॉडेल देशभरात लागू करण्यावर भर दिला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, इंदूरने जे लोकसहभागाचे मॉडेल स्वीकारले आहे ते सर्व शहरांनी स्वीकारले पाहिजे. इंदूर मॉडेल देशभरात लागू करण्याची गरज आहे. मोठ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेशने बाजी मारली आहे, त्यासाठी मूर्मू यांनी मध्य प्रदेशातील नागरिकांचे अभिनंदन केले. गेल्या वर्षी इंदूर क्रमांक 1, भोपाळ 7 व्या, ग्वाल्हेर 15 व्या आणि जबलपूर 20 व्या क्रमांकावर होते. 1 ते 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये गेल्या वर्षी उज्जैन हे देशातील पाचवे स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले होते. त्याचवेळी देवासने 10 वा क्रमांक पटकावला होता.
या पाच कारणांमुळे इंदूर ठरले अव्वल
घरोघरी संकलन : शहरात कचरापेट्या नाहीत. 1500 वाहनांच्या नेटवर्कमुळे हा कचरा थेट घरांमधून कचरा हस्तांतरण केंद्रांवर पोहोचवला जातो. इतर शहरे हे काम अद्याप 100% करू शकलेले नाहीत. त्यामुळे अनेक शहरांमध्ये आजही कचऱ्याचे ढीग दिसतात.
कचऱ्याचे वर्गीकरण: येथे घरातून वाहनांपर्यंत पोहोचणारा कचरा वेगळा केला जातो. ओला, सुका, प्लॅस्टिक, सॅनिटरी वेस्ट, इलेक्ट्रिक व घरगुती हानिकारक कचरा स्वतंत्र पेटीत टाकला जातो. तर, इतर शहरांमध्ये आजही हा कचरा वेगळा न करता एकत्रच गोळा केला जातो.
सीवरेज ट्रीटमेंट प्लांट : येथे नदी-नाल्यांच्या काठावर तीन वर्षांत सात मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प बांधण्यात आले. गटाराचे प्रक्रिया केलेले पाणी वापरण्यासाठी टाक्या बांधण्यात आल्या आहेत. प्रक्रिया केलेले हेच पाणी दीडशे बागांमध्ये पाईपद्वारे जाते.
कचऱ्यापासून उत्पन्न : महापालिकेला सुका कचरा विलगीकरण प्रकल्पातून वर्षाला १.५३ कोटी रुपये, ओल्या कचऱ्याच्या जैव-सीएनजी प्रकल्पातून दरवर्षी २.५३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. बायो-सीएनजी प्लांटमधून बाजारभावापेक्षा पाच रुपये कमी दराने सीएनजी गॅस मिळतो. त्यामुळे वर्षभरात दीड ते दोन कोटी रुपयांची बचत होते.
3R मॉडेल: महानगरपालिकेने शहरात रीसायकल, रियूज आणि रिड्यूस मॉडेल लागू केले आहे. एक हजाराहून अधिक बेकलेनमध्ये सिमेंटेशन, साफसफाई आणि पेंटिंग केले जाते. टाकाऊ वस्तूंपासून कलाकृती बनवण्यात येतात. याशिवाय शहरात 3R मॉडेलवर उद्यानांची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय येथे रहिवाशांना ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठीही प्रोत्साहित केले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.