राज्यातील 'या' 15 जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो लॉकडाउन ! मार्चमध्ये वाढले तेराशे मृत्यू अन्‌ साडेतीन लाख रुग्ण

1lockdown_15.jpg
1lockdown_15.jpg

सोलापूर : राज्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावरील कोरोनाने पुन्हा एकदा आपला जम बसवायला सुरवात केली आहे. 1 ते 22 मार्च या काळात राज्यभरात तब्बल तीन लाख 43 हजार रुग्ण वाढले आहेत. राज्यभरात तेराशे रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत. या पार्श्‍वभूमीवर सर्वाधिक रुग्णवाढ आणि मृत्यू होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये काही दिवसांचा लॉकडाउन होऊ शकतो. जेणेकरून कोरोनाच्या प्रादुर्भावाची साखळी खंडीत होईल, असा त्यामागे हेतू असेल. दुकानदार, हॉटेल, बिअरबार चालकांनी सध्या घातलेल्या निर्बंधानुसार वाटचाल सुरु ठेवल्यास आणि नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन केल्यास लॉकडाउनची गरज भासणार नाही. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी या विषाणूची साखळी खंडीत होणे गरजेचे आहे. 

मार्च महिन्यात पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, जळगाव, औरंगाबाद, नाशिक या जिल्ह्यांमध्ये 15 ते 65 हजारांपर्यंत रुग्ण वाढले आहेत. दुसरीकडे नगर, जालना, नांदेड, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्येही पाच ते दहा हजारांपर्यंत रुग्ण वाढले आहेत.

ठळक बाबी...

  • गोंदिया, वाशिम, हिंगोली व सिंधुदूर्ग वगळता सर्वच जिल्ह्यांमधील मृतांची संख्या दोनशेहून अधिक
  • मार्चमध्ये (1 ते 22 मार्च) तीन लाख 43 हजार रुग्ण वाढले तर तेराशे जणांचा कोरोनाने घेतला बळी
  • 1 मार्च रोजी ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या 77 हजार 618 होती; सध्या एक लाख 40 हजार रुग्णांवर सुरु आहेत उपचार
  • राज्यातील सात जिल्ह्यांमधील रुग्णवाढीचा आलेख मोठा, अन्य आठ जिल्ह्यांमध्येही दिवसेंदिवस वाढताहेत कोरोना पॉझिटिव्ह
  • 22 दिवसांत पुणे जिल्ह्यात वाढले सर्वाधिक 65 हजार रुग्ण; मुंबईच्या तुलनेत नागपूर पुढे, मार्चमध्ये नागपुरात 47 हजार 559 रुग्णांची वाढ
  • सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी दिला लॉकडाउनचा इशारा; सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू होणाऱ्या जिल्ह्यांमध्येच होऊ शकतो काही दिवसांचा लॉकडाउन
  • नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे नागरिकांना आवाहन; लॉकडाउननंतरही विद्यापीठ, केंद्र व राज्य सरकारच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होण्याची शक्‍यता

डिसेंबर 2020 अथवा जानेवारी 2021 या दरम्यान कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी शक्‍यता आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी वर्तविली होती. मात्र, कमी झालेल्या कोरोनाने वर्षानंतर पुन्हा जोर धरला आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरणाचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु झाले असून 45 ते 60 वर्षांपर्यंतच्या को-मॉर्बिड रुग्णांना (पूर्वीचे गंभीर आजार असलेले रुग्ण) आणि 60 वर्षांवरील सर्वांनाच लस टोचली जात आहे. त्यासाठी खासगी व सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही सोय करण्यात आली आहे. तत्पूर्वी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 'कुटूंब माझी जबाबदारी' ही मोहीम सुरु केली तर आता कोरोनावरील लसही उपलब्ध झाली. तरीही मृतांमध्ये सर्वाधिक को-मॉर्बिड रुग्ण व ज्येष्ठच आहेत.

जिल्हानिहाय वाढलेले रुग्ण (1 ते 22 मार्च)
मुंबई (39165), ठाणे (27,454), पुणे (64,772), नाशिक (23,473), जळगाव (15,192), औरंगाबाद (17,656), नागपूर (47,559), वर्धा (5,463), बुलडाणा (6,866), अकोला (8,797), अमरावती (9,844), नांदेड (8,849), नगर (9,175), यवतमाळ (6,734) या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर (2,184), भंडारा (1,476), वाशिम (4,094), उस्मानाबाद (1,327), हिंगोली (1,219), परभणी (2,403), लातूर (3,142), बीड (3,803), धुळे (4,494), नंदूरबार (3,994), सोलापूर (3,970), कोल्हापूर (840), सांगली (1,336), सातारा (3,431), रायगड (4,968) आणि पालघर (2,055) अशाप्रकारची रुग्णवाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com