Sharad Pawar : लोकशाही संपविण्यास निघालेल्या उन्मादी सरकारला उलथवून टाका

सत्ता ही लोकांसाठी, लोकशाही टिकवण्यासाठी असते, प्रत्यक्षात ही लोकशाही उद्ध्वस्त करण्याचे काम सरकारकडून सुरु आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar esakal

पुणे - 'लोकांना आश्‍वासने द्यायची आणि प्रत्यक्षात कूटनीती खेळायची, ही मोदींची नीती आहे. आता त्यांच्या हातात सत्ता द्यायची नाही. सत्तेचा उन्माद काय असतो, हे त्यांनी झारखंड, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना, पश्‍चिम बंगालच्या मंत्र्यांना तुरुंगात टाकून दाखवून दिले.

सत्ता ही लोकांसाठी, लोकशाही टिकवण्यासाठी असते, प्रत्यक्षात ही लोकशाही उद्ध्वस्त करण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. म्हणूनच लोकशाही संपविण्यास निघालेल्या उन्मादी सरकारला उलथवून टाकण्याची आपली जबाबदारी आहे.' अशी घणाघाती टीका करत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर थेट निशाणा साधला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे व पुणे लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर क्वार्टर गेट परिसरातील शांताई हॉटेलसमोर झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेमध्ये तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

यावेळी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहीर, पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे, कॉंग्रेसचे नेते डॉ. विश्‍वजीत कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, माजी खासदार अशोकराव मोहोळ, मोहन जोशी, उमेदवार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे व रवींद्र धंगेकर आदी यावेळी उपस्थित होते.

मोदी सरकारने दिलेल्या आश्‍वासनांवर पवार यांनी टीकेची झोड उठवली. पवार म्हणाले, 'सत्ता हातात असणाऱ्यांनी दहा वर्षे जनतेची फसवणूक केली आहे. महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, महिलांवरील अत्याचारासारख्या घटनांकडे त्यांनी दुर्लक्ष केले. सरकारने दिलेली आश्‍वासने आणि वस्तुस्थिती यामध्ये फरक आहे.

मोदी २०१४ मध्ये सत्तेवर आले. तेव्हा, पेट्रोलचा दर ७१ रुपये होता, मोदींनी ५० दिवसात मी पेट्रोलच्या किमती कमी आणतो, असे आश्‍वासन दिले होते, त्यास आता ३ हजार ६५० दिवस झाले असून आज पेट्रोलचा दर १०६ रुपये इतका आहे. तेव्हा, घरगुती गॅस ४१० रुपये होता, आज १ हजार १६० रुपये सिलिंडरचा दर आहे. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे तिसरे आश्‍वासन त्यांनी दिले.

१० वर्षात या नोकऱ्या मिळाल्या नाहीत, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. देशातील 86 टक्के तरुणांना आज नोकऱ्या मिळत नाहीत. अशा प्रकारे आश्‍वासने न पाळता कूटनीती खेळायची, मोदींची नीती असेल, तर त्यांच्या हातात सत्ता द्यायची नाही, हा निकाल आता आपल्याला घ्यावा लागेल.'

विरोधी पक्षाचे मंत्री, मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याच्या प्रकाराचाही पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. पवार म्हणाले, 'सत्तेचा उन्माद काय असतो, हे मोदींच्या कृतीवरून दिसते. त्यांच्यावर टीका केली म्हणून, त्यांनी झारखंडचे आदिवासी मुख्यमंत्री, दिल्लीचे लोकाभिमुख मुख्यमंत्र्यांना आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या चार मंत्र्यांना तुरुंगात टाकले.

सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी, लोकशाही जगवण्यासाठी असते. ही लोकशाही उद्ध्वस्त करण्याचे काम आज सुरु आहे. म्हणूनच या निवडणुकीत मोदी सरकार आणि त्यांच्या विचारांचा पराभव केल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, ही आपली जबाबदारी आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com