Teachers : राज्यातील ‘गुरुजी’ होणार अद्ययावत

राज्यातील शालेय शिक्षणाची आणि शिक्षकांची ढासळलेली गुणवत्ता सुधारण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पाऊल उचलले आहे.
Online Education
Online EducationSakal
Summary

राज्यातील शालेय शिक्षणाची आणि शिक्षकांची ढासळलेली गुणवत्ता सुधारण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पाऊल उचलले आहे.

मुंबई - राज्यातील शालेय शिक्षणाची आणि शिक्षकांची ढासळलेली गुणवत्ता सुधारण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पाऊल उचलले आहे. त्यासाठी लवकरच प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचे आशयाधारित मूल्यांकन करून त्यांच्यासाठी ऑनलाइन व मिश्र अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. या माध्यमातून शिक्षक, मुख्याध्यापक यांना अद्ययावत केले जाणार आहे.

शिक्षकांची गुणवत्ता सुधारली जावी यासाठी राज्यात ‘स्टार्स'' प्रकल्पांतर्गत २०२२-२३ मध्ये पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचे आशयाधारित मूल्यांकन केले जाणार आहेत. त्या माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी गरजाधिष्ठित ऑनलाइन व मिश्र अभ्यासक्रम निर्मिती केली जात असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

अनुदानित आणि सरकारी शाळेतील शिक्षकांना लाखो रुपयांचे वेतन आणि इतर सोयीसुविधा मिळूनही खूप मोठ्या प्रमाणावर शालेय शिक्षणातील गुणवत्ता सुधारू शकत नसल्याचे वेळोवेळी समोर आले. अनुदानित आणि सरकारी शाळेतील काही शिक्षक आपल्या अध्ययन पद्धतीत नीट योगदान देत नसल्याने तसेच ते वेळोवेळी अद्ययावत होत नसल्याने गुणवत्तेचे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे शिक्षकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन अद्ययावत करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे.

गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेत मागील नऊ वर्षांत भावी शिक्षक उमेदवार उत्तीर्ण होण्याची संख्या सरासरी चार टक्क्यांच्या वर पोहचू शकलेली नाही. नुकत्यात जाहीर झालेल्या ‘टीईटी’ परीक्षेत गणित आणि विज्ञान विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेमध्ये केवळ १.४५ टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले असल्याने शिक्षकांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

शाळांची माहिती (यू डायस २०२१-२२ नुसार)

  • १,०९,६०५ - राज्यातील एकूण शाळा

  • २,२५,८६,६९५ - एकूण विद्यार्थी संख्या

  • ७,४८,५८९ - एकूण शिक्षक संख्या

  • ३० - विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर

  • ७ - प्रतिशाळा शिक्षक

  • २०६ - प्रतिशाळा विद्यार्थी संख्या

‘निष्ठा’चे आयोजन

राज्यातील शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना ‘निष्ठा १.०’, ‘निष्ठा २.०’ चे आयोजन करून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्यातील शासकीय व अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिले ते पाचवीच्या शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी ऑनलाइन ‘निष्ठा ३.०’चे (एफएलएन) आयोजन केले होते.

ब्लेंडेड मोड कोर्स म्हणजे काय?

मिश्रित प्रणाली किंवा ‘ब्लेंडेड मोड’ अभ्यासक्रम म्हणजे एक औपचारिक शिक्षण कार्यक्रम ज्यात विद्यार्थी पाठ्यक्रमाचा एक भाग शाळेत पूर्ण करतो; तर दुसरा भाग डिजिटल किंवा ऑनलाइन साधनसंपत्तीचा वापर करून पूर्ण करतो. या शिक्षण प्रणालीत वेळ, जागा, वेग याचे नियंत्रण विद्यार्थ्यांवर अवलंबून असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com