
विधानसभा निवडणुकीचे सुरवातीचे कल समोर आले असून, भाजपचे स्वबळाचे स्वप्न भंगले आहे. राज्यात नवे समीकरण तयार होताना दिसत असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही दीड वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगत वेगळे संकेत दिले आहेत.
पुणे : विधानसभा निवडणुकीचे सुरवातीचे कल समोर आले असून, भाजपचे स्वबळाचे स्वप्न भंगले आहे. राज्यात नवे समीकरण तयार होताना दिसत असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही दीड वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगत वेगळे संकेत दिले आहेत.
भाजप-शिवसेना महायुतीत लढले असले तरी निकालापूर्वीच स्वबळावर सत्तेवर येण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपचे स्वप्न सुरवातीच्या कलानुसार भंगल्याचे दिसत आहे. भाजपला सत्तेसाठी शिवसेनेची मदत घेण्याशिवाय पर्याय नाही हे सध्यातरी दिसत आहे. तसेच राज्यात नवे राजकीय समीकरण उदयास येण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही मोठी आघाडी घेतली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ते सर्वात पुढे होते. साताऱ्यातील सभेत त्यांनी भर पावसात केलेल्या भाषणाची सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली होती. त्यातच सगळ्यात आधी पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगत त्यांनी येथेही आघाडी घेतली आहे.
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षांतर करून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केल्याने यंदाची विधानसभा निवडणूक गाजली होती. काही अपवाद वगळता यापैकी सर्व 'आयारामां'ना सत्ताधारी पक्षांनी उमेदवारी दिली आहे, त्यामुळे या जागांच्या निकालाकडे लक्ष होते. धनंजय मुंडे, रोहित पवार, आदित्य ठाकरे, आदिती तटकरे असे प्रमुख उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील माजी मंत्री नशीब अजमावत आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढविलेल्या गोपीचंद पडळकर यांना भाजपने बारामतीतून अजित पवार यांच्या विरोधात उतरविल्याने ही लढत महत्त्वपूर्ण ठरली होती.