MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत तीन जागांचा तिढा सोडविण्यासाठी काल (बुधवारी) प्रमुख नेत्यांची खलबते झाली. मात्र शिवसेना उध्दव ठाकरे गटाने जाहीर केलेल्या कोणत्याच जागांबाबत फेरविचार करण्यास स्पष्ट नकार दिल्याने जागा वाटपाचा तिढा कायम राहिला आहे.
काँग्रेसने उत्तर मुंबईची जागा लढविण्यास नकार दिला आहे. तसेच मुंबईतील दक्षिण मध्य मुंबईची जागा शिवसेनेने सोडावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसने शिवसेनेकडे (ठाकरे गट) केली. सांगली, दक्षिण मध्य मुंबई आणि भिवंडीबाबत मार्ग निघू शकला नाही.
महाविकास आघाडीने यापूर्वी जाहीर केलेली संयुक्त पत्रकार परिषद आज रद्द केली. मात्र ठाकरे गटाने स्वतंत्र पत्रकार परिषद घेत चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावेळी त्यांनी काँग्रेसने उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईतून त्यांचे उमेदवार जाहीर करावेत, असे आवाहन केले.
मात्र, काँग्रेसला उत्तर मुंबई हा मतदारसंघ नकोच असून ती जागा शिवसेनेने लढवावी. मात्र दक्षिण मध्य मुंबईची जागा काँग्रेसला सोडावी, अशी मागणी काँग्रेसने या बैठकीत केली. तसेच काँग्रेसचा सांगलीचा आग्रहही कायम आहे. भिवंडीची जागा राष्ट्रवादीसाठी सोडावी अशी मागणी केली. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीला पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत आणि जयंत पाटील उपस्थित होते.
दरम्यान महाविकास आघाडीने या जागांवर तोडगा काढण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. या जागांवरील तिढा सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काल या जागांबाबत घेतलेली बैठक निष्फळ ठरली आहे.
सांगली, भिवंडी, सातारा आणि दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम आहे. या चारही जागांवर अद्यापही तोडगा निघालेला नाही.
ठाकरे गट हा सांगली आणि दक्षिण मध्य-मुंबई या जागेवरून माघार न घेण्यावर ठाम असल्याची माहिती आहे. तर भिवंडी आणि सातारा या जागेसाठी शरद पवार गटाची आग्रही भूमिका कायम असल्याचं सांगण्यात येत आहे. या पूर्वी देखील शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या घरी झालेली ६ तासांची बैठक निष्फळ ठरली होती.