‘महाविकास’ची समन्वय समिती

Mahavikas co-ordination Committee
Mahavikas co-ordination Committee

मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकण्यासाठी प्रथमच तीन पक्षांच्या केंद्रीय नेत्यांची समन्वय समिती लवकरच स्थापन केली जाणार असल्याचे समजते. यापूर्वी राज्यस्तरावरील नेत्यांची समिती स्थापन केली जात होती.

राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्याने, अनेक नेत्यांच्या विधानामुळे उलटसुलट चर्चांमुळे राजकीय फड रंगत आहे. त्यामुळे हे वादविवाद टाळण्याबरोबरच सरकार पाच वर्षे टिकण्यासाठी केंद्रीय स्तरावरील समन्वय समिती स्थापन होणार आहे. काँग्रेसचे अहमद पटेल आणि मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल, शिवसेनकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार अनिल देसाई या समितीत असतील असे सांगण्यात आले. समिती केंद्रीय स्वरूपात असल्याने समितीचा धाक तिन्ही पक्षांचे नेते आणि मंत्रिमंडळावर असेल. समन्वय समितीची बैठक प्रत्येक महिन्यात होणार असून सरकारच्या कामांचा आढावा ही समिती घेईल. सरकारमधील अंतर्गत वादाचे विषय असतील तर ते समितीच्या बैठकीत चर्चिले जातील आणि त्यातच निर्णय होईल. या विषयांवर तिन्ही पक्षांच्या कोणत्याही नेत्याला बोलण्यास मज्जाव असेल. त्याचबरोबर पक्षाची स्वतंत्र भूमिका मांडण्याची जबाबदारी पक्षाच्या एका नेत्याकडे असेल, त्यामुळे कोणतेही वादविवाद होणार नाहीत, असा निर्णय तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी घेतल्याचे समजते. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून अनेक विषयांवर तिन्ही पक्षांच्या नेत्यांची परस्पर 

विधाने समोर आल्याने विरोधात असलेल्या भाजपला टीका करण्याची आयतीच संधी मिळत असल्याने समन्वय समिती लवकरच स्थापन होणार आहे.

नेत्यांचे बोल
      इंदिरा गांधी आणि करीम लाला यांची भेट व्हायची 
    - संजय राऊत

      संजय राऊत यांनी सांभाळून बोलावे 
    -बाळासाहेब थोरात

      इंदिराजींबाबत शिवसैनिक कोणतेही विधान करणार नाही
    - आदित्य ठाकरे

      स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सन्मान झालाच पाहिजे 
    - संजय राऊत

      सावरकरांबाबत पक्षाचे धोरण वेगळे आहे. सत्तेसाठी कोणतीही तडजोड नाही 
    - विजय वडेट्टीवार

      स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान मोठे
    - खासदार हुसेन दलवाई

      २०१४ मध्ये शिवसेनेने काँग्रेसला प्रस्ताव दिला होता
    - पृथ्वीराज चव्हाण

      तेव्हा काय झाले, माहीत नाही
    - ॲड. अनिल परब

      सरकार पाडण्यासाठी शिवसेनेचा प्रस्ताव होता; परंतु त्यात दम नव्हता
    - विजय वडेट्टीवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com