मुंबई : महावितरणच्या वीज बिल थकबाकीचा डोंगर ८७ हजार कोटींवर पोहोचला आहे. त्यामध्ये महिन्याला ४०० ते ५०० कोटी रुपयांची भर पडत आहे. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महावितरणने थकबाकी वसुलीसाठी कंबर कसली आहे.
त्यानुसार कृषिपंप वगळता सुमारे १३ हजार ४३३ कोटी रुपयांची थकबाकी मार्चमध्ये वसूल केली जाणार आहे. त्यासाठी दोन महिन्यांचे वीज बिल थकल्यास वीज कापण्याचा इशाराही महावितरणने दिला आहे.
महावितरणची कृषिपंपधारक आणि कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांना वगळून सुमारे ८३ लाख घरगुती आणि वाणिज्यिक वीज ग्राहकांकडे १३ हजार कोटी रुपयांहून अधिकची थकबाकी आहे. त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढ होऊ नये, मार्चअखेर जास्तीत जास्त थकीत रक्कम वसूल करण्याचे निर्देश विभागीय कार्यालयांना दिले आहेत. तसेच
एखाद्या वीज ग्राहकाची दोन वीज बिलांची थकबाकी राहिल्यास त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश दिले असल्याचे महावितरणच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयांतर्गत छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि लातूर जिल्हे येतात. या परिसरात मोठ्या प्रमाणात वीज बिलाची थकबाकी आहे. त्यामुळे सदर प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी स्वतंत्र परिपत्रक काढत मार्च अखेरपर्यंत अधिकारी-कर्मऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. तसेच पूर्व परवानगिशिवाय कोणीही सुट्टी घेऊ नये, असे बजावले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.