
मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन तब्बल ४५ दिवसांनी विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला आज अखेरीस मुहूर्त मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री बनले असून बीड आणि पुण्याचे पालकत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई शहर अन् ठाण्याचे पालकमंत्री असतील. धनंजय मुंडे यांना अखेर डच्चू मिळाला असून त्यांना या यादीतून वगळण्यात आले आहे. पालकमंत्रिपदे राखण्यातही भाजपने बाजी मारल्याचे दिसते. त्याखालोखाल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यांची मनसबदारी मिळाली आहे.