पुणेः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून राज्यसेवा मुख्य परिक्षेचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यानंतर श्रेयवादाचं राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
एमपीएससीच्या या निर्णयानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. कोणी येणार, कोणी जाणार यामुळे निर्णय घेतले जात नसतात, असं म्हणून त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली होती. त्यानंतर हालचाली वाढल्या आणि आज निर्णय घेतला गेला. त्यानंतर आदित्य ठाकरे हेदेखील आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेणार होते. मात्र त्यापूर्वीच निर्णय झाला. त्यावर बोलतांना मुख्यमंत्र्यांनी कुणाच्या येण्याजाण्याने निर्णय घेतला नसून आयोग स्वायत्त असल्याचं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्य शासन विद्यार्थ्यांच्या भूमिकेसोबत होतं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे आम्ही एमपीएससीला विनंतीही केली होती. त्याप्रमाणे आजचा निर्णय झाला आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आम्हाला या निर्णयाचं राजकीय श्रेय घेण्याची गरज नाही. काही लोक विद्यार्थ्यांअडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत होते.
निर्णय 'मविआ' सरकारने घेतला होता- शिंदे
एमपीएससीचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला होता. तरी आम्ही विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन सकारात्मक भूमिका घेतली. कोणी आल्याने निर्णय घेतला जात नसतात. काही लोक विद्यार्थ्यांच्या अडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.