
Jitendra Awhad Bodyguard : जितेंद्र आव्हाड यांच्या बॉडीगार्डची आत्महत्या; काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा तत्कालीन बॉडीगार्डने आत्महत्या केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. (ncp Jitendra Awhad bodyguard Vaibhav Kadam committed suicide )
जितेंद्र आव्हाड यांचे तत्कालीन बॉडीगार्ड वैभव कदम याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अनंत करमुसे प्रकरणातही कदम यांचे नाव आरोपी म्हणून आहे. या प्रकरणी त्यांची चौकशी सुरु होती.
ठाण्यातील घोडबंदर रोड येथील कावेसर भागात राहणारे अभियंता अनंत करमुसे यांनी ५ एप्रिल २०२० रोजी तत्कालीन ठाकरे सरकारमधील गृहनिर्माण मंंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह टीप्पणी केल्याच्या रागातुन आव्हाड यांचे पोलीस अंगरक्षक आणि कार्यकर्त्यांनी करमुसे यांना घरातुन उचलुन आव्हाड यांच्या नाद बंगल्यावर नेले होते.
ही मारहाण आव्हाड यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या घरीच झाली होती, असा आरोप होता. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना ही घटना घडली होती. त्यावेळी आव्हाड हे मंत्रिपदी असल्यानं विरोधकांनी मोठा गदारोळ केला होता. त्यामुळं या प्रकरणात आव्हाड यांना अटकही झाली होती.
आव्हाड यांच्या उपस्थितीत अंगरक्षक व कार्यकर्त्यांनी करमुसे यांना अमानुषरित्या बेदम मारहाण केली होती. यामध्ये वैभव कदम यांचेही नाव होते.
मात्र, लगेचच त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. हे प्रकरण सीबीआयकडं सोपवावं, अशी मागणीही करण्यात आली होती.