
Nitin Gadkari : आगामी निवडणुकीबाबत गडकरींचं मोठं विधान म्हणाले, 'तरीही मला लोकं...'
Nitin Gadkari : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव वगळण्यात आल्यानंतर गडकरी राजकारणातून निवृत्त होणार असल्याचा चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या. मात्र, त्यानंतर आता गडकरींनी आगामी निवडणुकींबाबत मोठं विधान केले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून, अनेक चर्चांना उधाण आले आहे. मुंबईतील अंधेरी येथील 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट'च्या दीक्षांत कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.
गडकरी म्हणाले की, मतदार ज्यांना निवडून द्यायच त्यांना निवडून देतात. सामान्यांना चांगलं काम करणाऱ्या व्यक्ती हव्या असून, मी कधीच कोणाच्या गळ्यात हार घातला नाही असे सांगत ते म्हणाले की, पुढच्या निवडणुकीत कटआउट, कार्यकर्त्यांना चहापाणी आणि पोस्टरही लावणार नाही असा निश्चय केला आहे. त्यामुळे निवडणुकीत मत द्यायचे आहे, तर द्या नाहीतर नका देऊ. मात्र, त्यानंतरही लोकं मला मत देतील असा विश्वास व्यक्त केला आहे. सामान्यांना कामं करणाऱ्या व्यक्ती हव्या आहेत असेदेखील गडकरींनी म्हटले आहे.
यावेळी नितीन गडकरी यांनी लोकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याच्या मुद्यावर भर दिला. आतापर्यंत 45 लाख कोटींची कामे केली असून, तंत्रज्ञान किती महत्त्वाचे आहे हे आम्ही पाहत आहोत. त्यामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवरील तोडग्यासाठी जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान, नियोजन जर नगरपालिका आणि महानगरपालिकेला दिले तर हा प्रश्न राहणार नाही. त्यासाठी जास्तीत जास्त तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देणे गरजेचे आहे.