मुंबई : ‘‘अमेरिकेत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषण ठोकण्याच्या तयारीत आहेत. हिंमत असेल, तर मोदी यांनी मणिपूरमध्ये जाऊन दाखवावे,’’ अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यावर हल्ला चढवला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही तिथे कोणी जुमानले नसल्याचे सांगून ठाकरे यांनी शहा यांनाही सोडले नाही.
शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांच्या राज्यव्यापी शिबिराचा समारोप ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. तेव्हा पंतप्रधान मोदी, शहांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे यांनी चहुबाजूंनी शाब्दीक हल्ले केले. ठाकरे म्हणाले, “मणिपूर पेटले असतानाही पंतप्रधान मोदी अमेरिकेला निघाले आहेत; पण ते मणिपूरला जात नाहीत.
भाषण देऊन ज्ञान पाजळण्यापेक्षा आपल्या देशातील मणिपूरमध्ये जायला हवे. त्यांनी तिथे जाऊन दाखवावेच; मणिपूरमधील लोक त्यांचे ऐकतात का पाहू. सत्तेच्या मस्तीमुळे फुगलेला तुमचा फुगा फुटायला वेळ लागणार नाही. सत्तेची मस्ती दाखवून तपास यंत्रणा वापरता; त्याही मणिपूरमध्ये पाठवा. त्या तिथे गेल्या, तर त्या परत येतील का पाहा. लोक त्यांना जाळून टाकतील. मात्र, ते न करता उपऱ्यांना दुसऱ्यांच्या घरात पाठवायचे, दमदाटी-फोडाफोडी करायची हेच धंदे करता.’’
“समान नागरी कायदा आणा, त्याला पाठिंबा असेल; पण आधी सगळ्यांना समान वागणूक द्या. वारकऱ्यांना मारणाऱ्यांचे हिंदुत्व कसले ?’’ असा प्रश्न उपस्थित करून ठाकरे म्हणाले, ‘‘ भाजप आता देशाचे स्वातंत्र्य गिळत आहे. मोकाट कुत्र्यांना ताब्यात घेणाऱ्या महापालिकेच्या गाडीसारखी स्थिती भाजपची झाली असून, कोणालाही उचलून आत टाकत आहेत. भाजप म्हणजे, ‘भ्रष्ट जनता पार्टी’ झाली असून, मुख्यमंत्री मिंधे यांना पैसे गोळा करण्याचे भाजपने टार्गेट दिले आहे.’’
हिटलरच्या पावलावर पाऊल?
“हिटरलही असाच माजला होता. हिटलर म्हणजे, छळ, लोकांची कत्तल असे चित्र डोळ्यापुढे येते. मात्र, हिटलरही हा अचानक जन्माला आला नव्हता. हेही लक्षात घेण्यासारखे आहे. आपल्याविरोधात काही घडणार नाही, याची काळजी त्याने घेतली. त्यानंतर विरोधक संपविले. ढळढळीत सत्य दडवून टाकायचे आणि मनमानी करायची, हे हिटलर करीत होता.
त्याच दिशेने आपण जात नाही ना? कारण हिटलरचे चिन्हही स्वस्तिकच होते, याकडे लक्ष वेधून ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मोदी-शहा यांच्यावर टीका केली. मी जेव्हा अफजल खान हा शब्द वापरला; तेव्हा लोक मला विचारत होते, तो शब्द का वापरला हे आता कळले ना, याचीही आठवण ठाकरे यांनी करून दिली.
ठाकरे म्हणाले...
देशातील लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी २३ जूनला पाटण्याला जाणार, ही देशप्रेमींची एकजूट सावरकरांचा धडा वगळणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेधच उद्या आपल्या पक्षाचा वर्धापन दिन तर परवा जागतिक गद्दार दिन तुम्हाला कुणी अदानींवर प्रश्न विचारला तर तुमची बोबडी वळते. तुम्ही राहुल गांधींना घराबाहेर काढता आणि आम्हाला प्रश्न विचारता सरकारकडून मुंबईची लूट सुरू आहे. त्यांनी जाहिरातीत बापच बदलला होता.
‘सांगता येत नाही अन् सहनही होत नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातीवरून ठाकरे यांनी फडणवीस यांना टोमणे मारण्याची संधी सोडली नाही. ‘‘फडणवीस यांनी अवस्था सहन होत नाही आणि सांगताही येत नाही,’’ अशी झाली असल्याचे सांगून ठाकरे यांनी फडणवीस यांना डिवचले. ‘‘सत्तेसाठी लाचारी पत्करून
मिंधे भाजपबरोबर गेले. गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरे घातले जात आहेत. शिवसेनाप्रमुखांचा विचार असा लेचापेचा आणि मिंधा नव्हता, अशा शब्दांत ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.