राज्यात लाचखोरीत पोलिस विभाग ‘टॉप’, तब्बल एवढ्या पोलिसांवर कारवाई

Police department is top in bribery in Maharashtra state
Police department is top in bribery in Maharashtra state

नागपूर :  राज्यात लाचखोरीचे प्रमाण वाढले असून, गेल्या नऊ महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४१२ यशस्वी सापळे रचले असून, ५६४ लाचखोरांवर गुन्हे दाखल केले. यामध्ये पोलिस विभाग पहिल्या स्थानावर कायम आहे. दुसऱ्या स्थानावर महसूल तर तिसऱ्या स्थानावर पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी बाजी मारली आहे.

प्रत्येक शासकीय विभागात लाच दिल्याशिवाय काम होत नाही, ही सत्यस्थिती आहे. लाच घेण्याच्या प्रकरणात पोलिस विभागाचा प्रथम क्रमांक लागतो. काही प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्यांचा अपवाद वगळता पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांपासून ते शिपायांपर्यंत लाचेशिवाय काम होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

अधिक वाचा - ग्राहकांनो खुशखबर! सोने- चांदीच्या भावात तब्बल इतक्या हजारांची घसरण; खरेदीसाठी ‘अच्छे दिन'

राज्यात गेल्या जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत ४४२ कारवाई करण्यात आल्या. त्यात पोलिस विभागावर सर्वाधिक ९५ सापळा कारवाई करीत १३८ पोलिस कर्मचाऱ्यांना अटक केली. तर महसूल, भूमिअभिलेख आणि नोंदणी विभागातील १०४ लाच प्रकरणात १४० जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच पंचायत समितीच्या ३४ सापळ्यात ४९ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली. पोलिस खात्यात सर्वाधिक लाच स्वीकारण्याची प्रकरणे झपाट्याने समोर येत आहेत.

पोलिसांचा ससेमिरा आणि स्वतःची बदनामी टाळण्यासाठी अनेक जण लाच या शस्त्राचा वापर करतात. तसेच काही पोलिस कर्मचारी लाच मिळविण्यासाठीच अनेकांना धमक्‍या देतात. शासकीय सेवेच्या अन्य खात्यातील अधिकाऱ्यांना लाच घेताना अडकवता येते. मात्र, पोलिस विभागातीलच अधिकाऱ्यांनी किंवा पोलिस शिपायांनी लाच मागितल्यास अनेक जणांना दाद मागण्यासाठी कुठे जावे, असा प्रश्‍न पडतो. कारण पोलिसांवरही कारवाई करणारे पोलिसच असल्यामुळे अनेक तक्रारकर्ते समोर येत नाहीत. नागपूर पोलिस दलातील १४ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एसीबीने गेल्या दोन वर्षात लाच घेताना अटक केली.

महत्त्वाची बातमी - धक्कादायक! नातेवाईकांनी शेवटच्या क्षणी चेहरा दाखवण्याची केली मागणी; अन प्लॅस्टिक बाजूला करताच...
 

रंगेहात म्हणजे काय?

लाचेच्या नोटांना फिनॉप्थेलिन किंवा अँथ्रासीन रसायनाची पावडर लागलेली असते. लाच स्वीकारल्यानंतर आरोपीचे हात सोडियम कार्बोनेटच्या द्रावणात टाकल्यानंतर हात लालसर किंवा गुलाबी होतात. यालाच रंगेहात अटक, असे म्हटले जाते. ही कारवाई पंचांसमक्ष होते. हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा असतो. तरीही आरोपींचे निर्दोष होण्याचे प्रमाण अधिक आहे. वस्तुत: एक शिक्षा ही भविष्यातील अनेक प्रकरणांना आळा घालणारी ठरू शकते.

तक्रारीची गांभीर्याने दखल 
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अशीच धडक्‍याने कारवाई करीत राहील. तक्रारकर्त्यांनी निर्भीड होऊन पुढे यावे, तक्रारदाराचे नाव गुपित ठेवले जाईल. लाच स्वीकारण्याची कुप्रवृत्ती नष्ट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोणत्याही विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्याने लाच मागितली तर बिनधास्त एसीबीत तक्रार करा. तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली जाईल.
-रजनीश सेठ, पोलिस महासंचालक, एसीबी


संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com