
Sambhajinagar Violence : छत्रपती संभाजी नगरमध्ये हिंसा उसळणार हे पोलिसांना माहिती होतं; पण...
मुंबईः बुधवारी मध्यरात्री छत्रपती संभाजी नगरमध्ये दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. जाळपोळही झाली. या घटनेनंतर पोलिसांवर ताशेरे ओढले जात आहे. यातच आता एक अपडेट हाती येतेय.
राज्याच्या गुप्तचर विभागाने दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा अहवाल पोलिसांना दिला होता. ज्या भागात दंगल झाली त्याच भागात अलर्ट दिला होता. परंतु पोलिसांनी गांभीर्याने घेतलं नाही. त्यामुळे परिस्थिती चिघळली. यासंबंधीचे वृत्त 'एबीपी माझा'ने दिले आहे.
हेही वाचाः जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
गुप्तचर विभागाचा अहवाल काय म्हणतो?
राज्याचा गुप्तचर विभाग अर्थात एसआयडीने पोलिसांना आधीच सतर्क केलं होतं. नामांतर आणि हिंदू मोर्चामुळे छत्रपती संभाजी नगरमध्ये अस्वस्थता आहे. नामांतरामुळे आपण शांत रहायचं नाही, असंही एका बैठकीत ठरल्याचं एसआयडीने सांगितलं होतं. तरीही पोलिसांनी गांभीर्याने घेतलं नाही. शिवाय घटना घडली तेव्हाही तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले नाहीत, असा आरोप होतोय.
छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी रात्री राडा झाला. दोन गटांमधल्या भांडणात अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली. तसेच दगडफेक देखील करण्यात आली. संतप्त जमावाने पोलिसांचे वाहनही जाळले. सध्या शहरामध्ये तणापूर्ण शांतता आहे.
दरम्यान काल (गुरुवार) शांतता कमिटीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या बैठकीला छत्रपती संभाजी नगरचे खासदार इम्तियाज जलील यांची उपस्थिती राहणार होती. त्यासाठी ते बैठकस्थळी दाखल झाले, मात्र ते बैठकीसाठी येताच काहींनी 'जय श्रीराम' नावाने घोषणाबाजी केली. त्यामुळे खासदार जलील तेथून निघून गेले.
४०० ते ५०० जणांवर गुन्हा दाखल
या घटनेनंतर तब्बल ४०० ते ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिनसी पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी १५ गाड्यांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांवर हल्ला करणे, दंगा भडकवणे आदी कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तपासासाठी ८ पथके नियुक्त केले आहेत.