पुणे - कुणाच्या आई- वडिलांचे छत्र नियतीने हिरावले, कुणाच्या नातेवाइकांनी रक्तसंबंधाची नाळ तोडून पोरगं अनाथालयाच्या दारात सोडलं, तर कुठे जन्मदात्यानेच निष्पाप जीव रस्त्यावर टाकला. नियती काय, समाज काय की नातलग काय हे कळायचे वय नसताना अनाथ होण्याचे दुर्दैव या मुलांच्या वाट्याला आले. अशी एक ना अनेक चिमुरडी बालके समोर येतात, तेव्हा हृदय पिळवटून जाते.. पण ‘बालग्राम एस.ओ.एस. चिल्ड्रेन्स व्हिलेजेस’ संस्थेची या चिमुकल्या जिवांना मायेची ऊब मिळते आणि त्यांच्या स्वप्नांना पंख फुटतात... यातील कुणाला डॉक्टर, कुणाला पोलिस अधिकारी, तर कुणाला क्रिकेटपटू व्हायचे असते.
येरवडा, अंबरनाथ, पनवेल आणि पन्हाळा येथील ‘बालग्राम’ हा अशा बालकांचा आसरा. तेथे सध्या दोनशेहून अधिक बालकांचा सांभाळ केला जातो. पण या बालकांच्या व्यथांनी येथील भिंतीदेखील उद्विग्न होत असतील, असे वास्तव येथे ऐकायला मिळते. यातील एका मुलीच्या आई-वडिलांचे छत्र कोरोनाने हिरावले. सरकार आणि समाजाने मदतीचा हात दिला. पण ही रक्कम नातेवाइकांनी हडप केली आणि त्यांनी या बालिकेला अनाथालयाच्या दारात आणून सोडले.
एक लहान मुलगी आई वडिलांबरोबर दुचाकीवरून प्रवास करत असते. तेवढ्यात भरधाव येणारे वाहन काळ बनून येते आणि जन्मदात्यांचे जीव जाताना पाहाणे या मुलीच्या वाट्याला येते. तिचे चिमुकले भावविश्वाला व्यापणाऱ्या आई-वडिलांचे सुखच नियतीने ओरबाडून नेले, यापेक्षा दुर्दैव ते काय असू शकते?
काही बालकांचे आई- वडील जिवंत आहेत, तरीही त्यांच्यावर अनाथ होण्याची वेळ आली. कारण त्यांचे पालक गुन्हा करताना पकडले गेले. त्यांना तुरुंगवास भोगावा लागत आहे. कुणाची आई निघून गेली, तर कुणाच्या आईला वडिलांच्या क्रौर्यामुळे जीव गमवावा लागला. परिणामी, त्यांना मायेची ऊब पारखी झाली. पण या मुलांशी बोलले की त्यांच्या बोलण्यातून दुर्दम्य आशावाद वाहत राहतो. परिस्थितीशी लढण्याची उमेद त्यांच्यात दिसते. या मुलांमधील निरागसता करपू द्यायची नसेल आणि त्यांना समाजात सन्मानाने उभे करायचे असेल, तर आता त्यांना गरज आहे ती आपल्या मायेची.
मदतीसाठी आवाहन
बालग्राममध्ये दोनशेहून अधिक मुला-मुलींचे पालनपोषण केले जाते. त्यांना तुम्ही आर्थिक मदत किंवा किराणा माल, मुलांच्या एक दिवसांच्या जेवणाचा खर्च, धान्य-कडधान्य, फळे, भाजीपाला, कपडे, शाळेचे साहित्य, खेळाचे साहित्य, विद्यार्थ्यांच्या खासगी शिकवणीचे किंवा शैक्षणिक शुल्क, अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमाचे शुल्क, संगणक वा तत्सम प्रशिक्षण, इंटरनेट, वैद्यकीय मदत, वैद्यकीय विमा, ई लर्निंगसाठी टॅब, शाळेत जाण्यासाठी वाहतुकीचा खर्च तसेच त्यांच्या सहलीचा खर्च अशा प्रकाराची मदत करू शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक : ९८८११३३१२३
मदतीसाठी येरवडा येथील बालग्राम एस.ओ.एस. चिल्ड्रेन्स व्हिलेजेस’च्या बँकेचा तपशील
बँकेचे नाव - बँक ऑफ इंडिया
शाखा - कोरेगाव पार्क
बँक खाते क्रमांक - 051210210000041
आयएफसीएस कोड - BKID0000512
एमआयसीआर कोड - 411013018
खाते प्रकार - करंट
आई-वडील गमावलेल्या आणि कुटुंबापासून तुटलेल्या बालकांना ‘बालग्राम’ सुरक्षित निवारा देत आहे. या संस्थेच्या येरवड्याबरोबरच अंबरनाथ, पनवेल आणि पन्हाळा येथे शाखा आहेत. या संस्थेत राहिलेले मुले-मुली शिक्षण घेऊन खासगी कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत. या मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी समाजातून नेहमीच हातभार लागला आहे. आजही ही संस्था सामाजिक भावनेतून मुलांचा सांभाळ करीत आहे. या मुलांचे भविष्य घडविण्यासाठी दानशूर नागरिकांनी पुढे यायला हवे.
- महेंद्र पिसाळ, मानद सचिव, बालग्राम एस.ओ.एस. चिल्ड्रेन्स व्हिलेजेस महाराष्ट्र
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.