एप्रिल-मेमध्ये ३२,३०० शिक्षकांची भरती! खासगी १७००० तर शासकीय १५००० पदे; ‘टेट’चा निकाल २० मार्चपूर्वी

‘टेट’ चा निकाल १५ दिवसांत जाहीर होणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. एप्रिल-मे महिन्यांत खासगी प्राथमिक, माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांसह जिल्हा परिषद, नगरपालिका-महापालिका शाळांमधील शिक्षकांची भरती होईल. एकाचवेळी ३२,३०० शिक्षकांची भरती होणार आहे.
Mantralay
Mantralayesakal

सोलापूर : ‘टेट’ परीक्षेचा निकाल आता १५ दिवसांत जाहीर होणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि एप्रिल-मे महिन्यांत खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांसह जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांच्या शाळांमधील शिक्षकांची भरती केली जाणार आहे.

एकाचवेळी साधारणत: ३२ हजार ३०० शिक्षकांची भरती होणार आहे. पंधरा वर्षांतील ही सर्वात मोठी भरती असल्याची माहिती शिक्षण खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

सेवानिवृत्ती, आकाली मृत्यू, पटसंख्या वाढ, स्वेच्छानिवृत्ती अशा विविध कारणांमुळे राज्यातील एक लाख शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे वाढली आहेत. मागील सहा वर्षांत शिक्षक भरती न झाल्याने आता रिक्त पदे भरण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला.

त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून दोन लाख ४० हजार उमेदवारांची ऑनलाइन ‘टेट’ परीक्षा नुकतीच पार पडली. त्याचा निकाल २० मार्चपूर्वी जाहीर केला जाईल, अशी माहिती परिषदेचे आयुक्त महेश पालकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली

‘टेट’ निकालानंतर जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद व महापालिका शाळांमधील शिक्षक भरतीसाठी मेरिट यादीनुसार उमेदवारांची यादी पवित्र पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. त्यानुसार संबंधित उमेदवारांना त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये थेट नियुक्ती मिळणार आहे.

दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी अनुदानित शाळा, महाविद्यालयातील शिक्षक भरती करताना एका जागेसाठी दहा उमेदवारांना पाठवले जाणार आहे. मुलाखतीतून त्यातील एका उमेदवाराची निवड केली जाईल. खासगी संस्थांमध्ये शिक्षक भरती करताना दहापैकी कोणत्या उमेदवाराला घ्यायचे हा अधिकार त्या संस्थेचा असणार आहे.

विद्यार्थ्यांच्या ‘आधारा’वर संचमान्यता

राज्यातील खासगी अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागील सहा वर्षांत शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे तब्बल ६७ हजार शिकांची पदे रिक्त झाली आहेत.

या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सर्वच शाळांची संचमान्यता होणार आहे. २०२२-२३ च्या संचमान्यतेवर शिक्षक भरती राबविली जाणार आहे. मात्र, त्यासाठी शाळांमधील आधार क्रमांक असलेल्या आणि विशेषत: ज्या विद्यार्थ्यांचे आधार व्हेरिफाय झाले, तीच पटसंख्या संचमान्यतेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानुसार त्या शाळांमधील रिक्त पदे निश्चित करून पदभरतीस मान्यता दिली जाणार आहे.

शिक्षकांच्या रिक्तपदांची सद्यस्थिती

  • ‘खासगी’ रिक्त पदे

  • ३४,६००

  • शासकीय रिक्त पदे

  • ३२,४००

  • शिक्षकांची एकूण रिक्त पदे

  • ६६,७००

  • भरती होणारे शिक्षक

  • ३२,३००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com