दुष्काळमुक्ती अन्‌ हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना मदत

Crowd-Funding
Crowd-Funding

सामाजिक समस्यांची सोडवणूक तीही समाजातून पैसे उभारत केली जात आहे. राज्याच्या विविध भागांत दुष्काळमुक्तीपासून ते शिक्षण अन्‌ हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ‘क्राउड फंडिंग’च्या माध्यमातून मदत केली जात आहे. ‘क्राउड फंडिंग’चेसुद्धा निरनिराळे स्वरूप पुढे आले आहेत. संस्था, व्यक्तिगत स्तरावरील प्रयत्नांना मिळालेल्या यशाचा घेतलेला हा मागोवा.

नाशिकमधील १४ गावे टॅंकरमुक्त
सोशल नेटवर्किंग फोरमच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील १४ गावे टॅंकरमुक्त करण्यात आली आहेत. या फोरमच्या माध्यमातून दोन कोटींची समाजोपयोगी कामे साकारण्यात आली आहेत. २०१० पासून सुरू असलेल्या फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी सामाजिक कामांना सुरवात केली. १५ डिसेंबर २०१४ ला संस्थेची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ‘क्राउड फंडिंग’च्या माध्यमातून सामाजिक उपक्रम पूर्णत्वास नेण्यास सुरवात केली. त्याअंतर्गत देशाचे संरक्षण करताना हौतात्म्य पत्करावे लागलेल्या १३ जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक साहाय्यता उपलब्ध करून दिली आहे.  नाशिकसह पुणे, मुंबई, नागपूर या शहरांप्रमाणेच अमेरिका, कतार, इजिप्त, दुबई, सिंगापूर आदी ठिकाणांहून मदत.

शंभर रुपयांत समाजसेवा
कोल्हापूरमधील प्रतिज्ञा नाट्यरंग या संस्थेने गरजूंना मदतीसाठी शंभर रुपयांत समाजसेवा ही संकल्पना यशस्वी केली. प्रत्येक महिन्याला उपक्रमात सहभागी असणाऱ्यांनी प्रत्येकी शंभर रुपये जमा करायचे आणि संकलित होणारा निधी समाजातील गरजूला द्यायचा, असा हा उपक्रम. त्याला जोडून पुढे गरजूंच्या मदतीसाठी गीत गायनाच्या विविध मैफली आणि नाट्य प्रयोगांचे आयोजन झाले. या मैफल अथवा प्रयोगाला येणाऱ्या रसिकांनी ऐच्छिक शुल्क कार्यक्रमाच्या ठिकाणी असणाऱ्या पेटीत टाकायचे आणि त्यातून संकलित होणारी रक्कम गरजूंना दिली जाते. आजवर या उपक्रमातून ६१० गरजूंना बारा लाखांहून अधिक मदत दिल्याचे प्रशांत जोशी यांनी सांगितले.  

जळगावमध्ये जलसंधारणाच्या कामांना हात
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी एकत्रित येऊन जलसंधारणाची मोठी कामे साकारलीत. भुसावळ, यावल, रावेर, बोदवड व जामनेर या तालुक्‍यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी केलेल्या कामातून सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. अडावद येथे राणी लक्ष्मीबाई बहूद्देशीय संस्थेतर्फे सहा किलोमीटरपर्यंत नाला खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले. पिंप्री (बुद्रुक) येथे ४ लाख रुपये खर्च करून तलाव करण्यात आला.

गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व
सोलापूरमधील भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठानतर्फे समाजातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेतले जात आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलीला प्रतिष्ठानतर्फे मदतीचा हात देण्यात आला. त्या मुलीच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. तसेच आजोबांचे छत्रही हरवले.  अशा स्थितीत तिला  दहावीमध्ये ९३ टक्के गुण मिळाले आहेत. गांधी प्रतिष्ठानने मुलीचे पालकत्व स्वीकारले आहे. तिला शिक्षणासाठी लागणारी आर्थिक मदत करण्यात येत आहे. गेल्या वर्षी अंजली लोखंडे या विद्यार्थिनीला मदत केली होती. कुटुंबातील मुलगा अथवा मुलगी शिकली तर त्यांच्या कुटुंबासमोरील अडचणी कमी होतील, असे प्रतिष्ठानचे संचालक पराग शहा यांनी सांगितले.

हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना ‘माय मराठी’ची मदत
देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांची जाण ठेवून ‘माय मराठी’ हा ‘व्हॉट्‌सॲप ग्रुप’ सैनिकांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी पुढाकार घेतो. अनपटवाडी (ता. वाई, जि. सातारा) हे या ग्रुपचे उगमस्थान. या ग्रुपने सुमारे पाच लाख रुपये उभे केले. देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी काम करत असलेल्या जयहिंद फाउंडेशन या संस्थेच्या मदतीने ‘माय मराठी’ समूहाच्या सर्व सदस्यांचा मुंबई येथे स्नेहमेळावा घेण्यात आला. या वेळी समूहाच्या प्रत्येक सदस्याने आपल्या परीने शक्‍य तेवढी मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. समूहाचे प्रमुख हणमंत मांढरे, जयहिंद फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप माने, उपाध्यक्ष अनिल अनपट यांनी राज्यभरातील अनेक प्रज्ञावंतांना समूहात जोडले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com