
Sanjay Raut: नेहरुंपासून ते मोरारजींपर्यंत शिवरायांचा अवमान करणाऱ्यांनी माफी मागितली होती; राऊत म्हणाले...
मुंबईः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यभर संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. कोश्यारींना महाराष्ट्रातून हाकलून द्या, अशा प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहे. यासंदर्भात आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर आसूड ओढला.
राऊत म्हणाले की, हा महाराष्ट्र शिवरायांची बदनामी कधीही खपवून घेणार नाही. यापूर्वी पंडित नेहरुंनी छत्रपतींबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. परंतु त्यांनी त्याबद्दल माफीही मागितली. कारण ते मोठे नेते होते. मोरारजी देसाई यांनीही चुकीच्या विधानानंतर माफी मागितली होती. परंतु भाजपच्या आराध्य दैवतांकडून छत्रपतींचा अवमान होतोय आणि माफी मागितली जात नाही. आता महाराष्ट्र आतून खवळलेला आहे. याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही... वेट अॅंड वॉच.. असा गर्भित इशारा संजय राऊतांनी दिला.
''नेहरु होते म्हणून देश निर्माण होऊ शकला. नेहरुंवरील चिखलफेक थांबवली पाहिजे. मुळात ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलं, त्यांचा अपमान थांबवा'' असं आवाहन संजय राऊतांनी केलं.
राऊतांनी यावेळी सर्व विरोधक एकत्र आल्याचं सांगितलं आहे. आमचा अॅक्शन प्लॅन तयार असून त्याबाबत हालचाली सुरु आहेत, असंही राऊत म्हणाले.