स्वयंघोषित समाजसेवक वाढले! ‘खंडणी’साठी आंदोलन केल्यास आता थेट आंदोलकांवरच गुन्हा

एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला त्रास देऊन जाणिवपूर्वक बदनाम करण्याच्या किंवा पैसे उकळण्याच्या उद्देशाने कोणी आंदोलन- उपोषण करीत असल्यास त्यांच्यावर थेट खंडणीचे गुन्हे दाखल होतील. उपोषणाचा व आंदोलनाचा हेतू स्वच्छ असावा.
cp rajendra mane
cp rajendra manesakal

सोलापूर : आंदोलनकर्त्यांचा संबंधित व्यक्ती किंवा संस्थेशी काहीही संबंध नसताना देखील काहीजण जाणीवपूर्वक समोरच्याला त्रास देणे, बदनामी करण्याच्या हेतूने उपोषण, आंदोलन करतात. त्यानंतर तडजोड करून पैशांची मागणी करून उपोषण मागे घेतले जाते. दुसरीकडे जयंती, मिरवणूक, सण-उत्सवात काहीजण जबरदस्तीने पैसे घेतात. अशा व्यक्तींविरुद्ध पुराव्यानिशी तक्रार केल्यास त्या आंदोलनकर्त्यांवर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.

साखर कारखान्यांची एफआरपी, शासकीय जागेवर अतिक्रमण, रस्त्यांसह इतर शासकीय काम निकृष्ट दर्जाचे करणारे ठेकेदार, वाढत्या प्रदूषणाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष, नद्यांमधील बेसुमार अवैध वाळू उपसा, यासह अनेक विषयांवर सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी संघटना दरवर्षी आंदोलने करतात. त्यातून शासनाचे लक्ष वेधून तो प्रश्न सोडविण्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन, उपोषण करतात.

मोर्चा, निदर्शने करतात. त्याची दखल घेऊन सरकार त्यावर सकारात्मक तोडगा देखील काढते. मात्र, अनेकदा गल्लीबोळातील स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते त्या व्यक्तीने भ्रष्टाचार केला, ते काम निकृष्ट केले, कारखान्यांमुळे प्रदूषण होत आहे, अवैध वाळू व मुरुम उपशाला अधिकाऱ्यांचे पाठबळ, साखर कारखानदार उसाचे वजन कमी दाखवतात असे अनेक विषय घेऊन काहीही संबंध नसताना उपोषण,आंदोलनाला बसतात.

त्यात त्यांचा वैयक्तिक स्वार्थ म्हणजेच पैसे मिळविण्यासाठी त्रास देण्याचा उद्देश असल्यास, आता त्यांना पोलिस जेलची हवा दाखवणार आहेत. काही दिवसांपूर्वी मोहोळ तालुक्यातील जकराया कारखान्याशी काहीही संबंध नसताना सहाजण जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेटजवळ उपोषणाला बसले होते. त्यांच्यावर सदर बझार पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सोशल मीडियाचा वापर करा जपूनच

सोशल मिडियातून कोणाची बदनामी होईल, असे वृत्त किंवा व्हिडिओ प्रसारित-व्हायरल करणाऱ्यांवरही अब्रुनुकसानीचे खटले दाखल होऊ शकतात. दुसरीकडे पोलिस खात्याची बदनामी होईल, असे कृत्य तथा मजकूर व्हायरल केल्यास ‘पोलिस अप्रितीची भावना अधिनियम-२०१२’नुसार देखील संबंधितांवर गुन्हे दाखल होतील, असेही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

आंदोलन, उपोषणाचा हेतू स्वच्छ असावा, अन्यथा...

एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला त्रास देऊन जाणिवपूर्वक बदनाम करण्याच्या किंवा पैसे उकळण्याच्या उद्देशाने कोणी आंदोलन- उपोषण करीत असल्यास त्यांच्यावर थेट खंडणीचे गुन्हे दाखल होतील. उपोषणाचा व आंदोलनाचा हेतू स्वच्छ असावा. सण-उत्सव, जयंतीवेळी कोणीही समोरील व्यक्तीला जबरदस्ती करू नये.

- डॉ. राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

खंडणी बहाद्दारांसाठी अशी आहे शिक्षेची तरतूद

खंडणी मागणाऱ्यांविरूद्ध आयपीसी कलम ३८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. हा गुन्हा जामीनपात्र, दखलपात्र असून त्यात संशयित आरोपींना दोन वर्षांची शिक्षा किंवा दंड अथवा दोन्ही (दंड व शिक्षा), अशा स्वरूपाची तरतूद कायद्यात आहे. हा खटला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर चालवला जातो, अशी माहिती जिल्हा सरकारी वकिल प्रदिपसिंग राजपूत यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com