हवाई पाहणी करून पूरग्रस्तांच्या वेदना समजत नाही; पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

हवाई पाहणी करून पूरग्रस्तांच्या वेदना समजत नाही; पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

लातूर : गणपती विसर्जनाचा दिवस होता. पहाटे साडेतीन वाजता शेवटच्या गणपतीचे विसर्जन झाले. त्यांनतर मी झोपायला गेलो. त्यावेळी माझ्या घरातील दारे-खिडक्या हलल्या. हा भूकंप आहे, हे मला लगेच कळले. किल्लारी भूकंपाचे केंद्रस्थान आहे, हे समल्यानंतर मी पुढच्या काही तासांत किल्लारीत पोचलो. त्या भयानक संकटात मी लोकांबरोबर होतो... अशा शब्दांत तत्कालीन मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी किल्लारीत झालेल्या प्रलयकारी भूकंपाच्या आठवणींना उजाळा दिला. तशीच प्रलयकारी घटना सध्या कोल्हापूर, सांगली या भागात घडली. पण पुरग्रस्तांबाबत मुख्यमंत्र्यांच्या ह्रदयात किंचितही ओलावा नाही. हवाई पाहणी करून लोकांचे दुःख, वेदना समजत नाहीत, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.

पवार यांनी बुधवारी (ता. 18) लातूरमधील पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी किल्लारी परिसरात 25 वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपाच्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले, त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. गृह खाते माझ्याकडे होते. त्यामुळे मी गणपती विसर्जनाच्या दिवशी रात्रभर जागा होतो. मिरवणूक पुढे नेण्यावरून भांडणे, वाद होतात. म्हणून अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून माहिती घेत होतो. शेवटी अधिकाऱ्यांचा साडेतीन वाजता दूरध्वनी आला आणि ते म्हणाले 'विसर्जन मिरवणूक शांततेत संपली आहे. शेवटचा गणपती विसर्जित झाला आहे.' त्यानंतरच मी झोपायला गेलो.

काही वेळाने माझ्या घराचे दारे, खिडक्या हलल्या. हा भुकंप आहे, हे मी ओळखलं. पावणे चार वाजता कोयनेला दूरध्वनी करून अधिकाऱ्याला उठवलं. माहिती घ्यायला लावली. तेंव्हा त्यांनी भुंकप असल्याचे सांगितले. 'भूकंपाचे केंद्र कुठे आहे', असे मी त्यांना विचारले. त्यांनी किल्लारी सांगितले. त्यानंतर मी लगेच वैमानिकाला तयार राहायला सांगितलं. 'आपल्याला किल्लारीला ताबडतोब जायचं आहे', असे सांगितले. सोबत विलासराव देशमुख यांना घेतलो. पावणे सहा वाजता मुंबईच्या विमानतळावर पोहोचलो. लातूरला सव्वा सात वाजता उतरलो. मग किल्लारीला पोहोचलो. घर पडलेली, माणसं मेलेली, काही गाडली गेलेली हेच चित्र आजूबाजूच्या सर्व गावांत आम्हाला पहायला मिळाले, असे पवार सांगत होते.

संकट इतके मोठे होते की हे पाहून मी किल्लारीतच राहण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री इथे राहिले की सगळे अधिकारी भोवती फिरणार आणि संकटग्रस्ताकडे दुर्लक्ष होणार, हे ओळखून मी सोलापूरला जावून राहिलो. रोज सकाळी लातूर, उस्मानाबाद करत राहिलो. 15 दिवस इथल्या लोकांबरोबर राहिलो. संकटग्रस्तांच्या पाठीशी राहण्यासाठीच लोकांनी सत्ता दिली होती. आम्ही आवाहन केल्यानंतर देशातून, जगातून मदत आली. इतकी मदत आली की ठेवायला जागा नव्हती, असे सांगून पवार म्हणाले, असेच संकट पुन्हा एकदा महाराष्ट्रावर ओढावले. पण सध्याचे मुख्यमंत्री केवळ हवाई पाहणी करण्यात रमले. अर्ध्या तासासाठी जमिनीवर आले. अशाने लोकांचं दुःख समजत नाही. जे लोक संकटग्रस्तांच्या पाठीशी नाहीत त्यांना आपण घरी बसवायला हवे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com