मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह लोकप्रतिनिधींचा सहभाग
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेतीच्या विकासासाठी केलेल्या कामांची शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन माहिती देण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. राज्यभर 25 ते 28 मे असे चार दिवस प्रत्येक गावात भाजपचे नेते, मंत्री, पदाधिकारी यांच्या शिवार संवाद सभा होणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह पक्षाचे सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व नगरसेवक असे चार हजार लोकप्रतिनिधी या संवाद मोहिमेत सहभागी होणार आहेत. या उपक्रमामध्ये भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी गावागावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेसाठी कार्यकर्त्यांसह श्रमदान करणार आहेत. कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर व भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. संजय कुटे हे शेतकरी संवाद सभांचे नियोजन करीत आहेत. त्यांनी सांगितले, की या उपक्रमात पहिल्या दिवशी 25 मे रोजी एकाच दिवशी सोळा हजार गावांमध्ये सोळा हजार सभा होणार आहेत. प्रत्येक लोकप्रतिनिधी सकाळी दोन व सायंकाळी दोन सभांमध्ये संवाद साधेल. हा उपक्रम 28 मे रोजी पूर्ण होईल. तोपर्यंत प्रत्येक गावातील शेतकऱ्यांशी भाजपच्या लोकप्रतिनिधींनी संवाद केलेला असेल.
ते म्हणाले, की पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातील गावांमध्ये, तर रावसाहेब पाटील दानवे उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्याच दिवशी पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कोकणात शिक्षणमंत्री विनोद तावडे, तसेच बीड जिल्ह्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे शेतकऱ्यांशी संवाद करतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवड येथे भाजप प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीचा समारोप करताना शेतकरी संवाद सभांच्या उपक्रमाची घोषणा केली होती. त्यानुसार केलेल्या नियोजनाप्रमाणे 25 ते 28 मे या कालावधीत या शेतकरी संवाद सभा होणार आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी भरीव काम केले आहे. शेतकऱ्यांना सरकारच्या या योजनांची पूर्ण माहिती होऊन वंचित शेतकऱ्यांना अधिक लाभ व्हावा म्हणून हा संवाद होणार आहे, असे सांगण्यात आले.
|