खेचून  आणलेला विजय!

sharad pawar
sharad pawar

महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर गेले महिनाभर सुरू असलेल्या सत्तानाट्याच्या शेवटच्या अंकाचा शेवटचा प्रवेश सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खरे तर बुधवारी विधानभवनातील विधानसभेच्या सभागृहात सादर व्हायचा होता. मात्र, त्या आधीच्या २४ तासांत या नाट्याला कलाटणी देणाऱ्या धक्‍कादायक घटना घडल्या आणि अवघ्या ७९ तासांत देवेंद्र फडणवीस यांची दुसरी राजवट संपुष्टात आली! हा अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोठा विजय आहे. पवार यांच्यासाठी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची होती. एकीकडे कौटुंबिक कलह, तर दुसरीकडे प्रतिष्ठेचे राजकारण, असा हा दुहेरी संघर्ष होता. प्रकृतीच्या तक्रारींची तमा न बाळगता अथक प्रयत्नांनी त्यांनी हे यश खेचून आणले आणि खरा ‘तेल लावलेला पहिलवान’ कोण, हे केवळ फडणवीस तसेच अजित पवार यांनाच नव्हे, तर भारतीय जनता पक्षाच्या नव्या ‘राजनीतीचे चाणक्‍य’ म्हणून गाजावाजा झालेले अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनाही दाखवून दिले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात फडणवीस हे थेट पवारांचा उल्लेख हेटाळणीच्या सुरात ‘तेल लावलेला पहिलवान’ असा करत होते. मंगळवारच्या दिवसभरात ज्या काही सनसनाटी घटना घडल्या, त्या बघितल्यावर आता फडणवीस यांना ‘शरद पवार’ नावाची चीज काय आहे, त्याचा साक्षात्कार झाला असणार! राज्यात गेले महिनाभर चाललेल्या सत्तानाट्याला पहिली कलाटणी दिली ती अजित पवार यांनी. शनिवारी ‘रामप्रहरी’ उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच त्यांनी आपला राजीनामा माध्यान्हप्रहरी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सादर केला. त्यानंतर आपल्या पाठीशी बहुमत नाही, असा आणखी एक साक्षात्कार फडणवीस यांना झाला आणि त्यांनी विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे न जाता, थेट राजीनाम्याचा पर्याय स्वीकारला! पवारांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि त्यानंतर सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत ही जी काही अटीतटीची झुंज दिली, ती काही केवळ फडणवीस वा त्यांना सोडून भाजपच्या गोटात जाऊन उपमुख्यमंत्रिपद हासील करणाऱ्या अजित पवार यांच्या विरोधात नव्हती. ही लढत होती नरेंद्र मोदी तसेच अमित शहा या भाजपच्या दोन बलदंड नेत्यांशी! हाती असलेल्या सत्तास्थानांचा मनमानी पद्धतीने वापर करत, येन-केन मार्गाने सत्ता हस्तगत करू इच्छिणाऱ्या प्रवृत्तीशी हा लढा होता. योगायोगाची बाब अशी की, पवारांनी हा विजय खेचून आणला तोही नेमक्‍या संविधान दिनाच्या सत्तराव्या वर्धापनदिनी. हे सुरू असतानाच, संसदेत घटनेच्या पावित्र्याचे गोडवे गाणाऱ्या पंतप्रधान मोदींना यामुळे पवारांकडून आणखी एक धडा शिकायला मिळाला! विधानसभा निवडणुकीचे निकाल २४ ऑक्‍टोबर रोजी लागल्यापासून दरदिवशी या नाट्यास कलाटणी मिळत गेली आणि या सत्तानाट्याचा अंतिम अंक अखेर गेल्या शनिवारी ‘रामप्रहरी’ राजभवनात देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीने साजरा झाला होता. तेव्हा प्रथमदर्शनी हा या कमालीच्या उत्कंठावर्धक नाट्याचा शेवटचा प्रवेश आहे, अशी भल्याभल्यांची समजूत झाली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्या नाट्यास पुढच्या चार दिवसांत अनेकदा कलाटणी दिली आणि हे नाट्य दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या चावडीवर जाऊन ठेपले. 

फडणवीस सरकारने बुधवारी सायंकाळी पाच वाजण्यापूर्वी बहुमताचा कौल घ्यावा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानेच दिला असल्याने अखेरचा हा प्रवेश विधान भवनात सादर करावा लागणार होता. खरे तर सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय देण्यास दोन दिवस लागले आणि फडणवीस तसेच अजित पवार यांना दोन-तीन दिवसांचा अधिक कालावधी आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी मिळाला. सरकारपक्षाचे बोलके पोपट आमच्याकडे १७०पेक्षा अधिक आमदार असल्याची ग्वाही याच काळात देत होते. मात्र, अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे अखेर फडणवीस यांना वास्तवाचे भान आले आणि सभागृहात पराभवाची नामुष्की पत्करायची की थेट राजीनामा द्यायचा, असे दोनच पर्याय त्यांच्यापुढे उरले. खरे तर या सत्तानाट्यात गेल्या चार दिवसांत जे काही घडले, ते सारेच चित्तचक्षुचमत्कारी होते. अजित पवारांबरोबर गेलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या काही आमदारांना शरद पवार यांनी नंतरच्या चार-सहा तासांतच पत्रकारांपुढे उभे केले. तेव्हापासूनच या अवचित शपथविधीचा फुगा फुटायला सुरुवात झाली होती. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या आमदारांनी अभूतपूर्व अशी एकजूट दाखवतानाच, सरकारपक्षाने आपल्या गोटात नेलेल्या राष्ट्रवादीच्या काही आमदारांना अकटोविकट प्रयत्न करून परत आणले. त्यामुळे अजित पवारांबरोबर ‘राष्ट्रवादी’चे एकच आमदार उभे असल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हाच खरे तर फडणवीस यांना भविष्याची चाहूल लागायला हवी होती. फडणवीस यांना ही जाणीव करून दिली ती अर्थातच सर्वोच्च न्यायालयाने. सभागृहात फडणवीस सरकारचे बहुमत, एवढा एकच विषय अजेंड्यावर असेल; तसेच गुप्त मतदान होणार नाही आणि या साऱ्या प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण होईल, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे फडणवीस तसेच अजित पवार यांचे धाबे दणाणले. याचे कारण त्यापूर्वी म्हणजे सोमवारच्या रात्रीपर्यंत ‘ऑपरेशन कमळ’ जोमाने राबवण्याच्या बाता केल्या जात होत्या. भाजपचे नेते नारायण राणे यांनी तर तशी ग्वाहीच जाहीरपणे दिली होती आणि सर्वांत मोठा खड्डा हा ‘राष्ट्रवादी’ला नव्हे तर शिवसेनेला पडणार, अशी दर्पोक्‍ती उच्चारली होती. त्या सर्वांवरच फडणवीस सरकारच्या राजीनाम्यामुळे पडदा पडला आहे. मात्र, या साऱ्या ‘खेळा’त अनेकांचे नैतिकतेचे मुखवटे गळून पडले आणि ‘हमाम में सब नंगे!’ या उक्‍तीची प्रचिती आली. 

आता खरा प्रश्‍न भाजपने हा औटघटकेचा डाव मांडून नेमके काय साध्य करण्याचा प्रयत्न केला, हा आहे. फडणवीस यांनी, स्थिर सरकार आणि जनतेचे प्रश्‍न तातडीने सुटावेत म्हणून विधिवत सरकार आणले, आदी बहाणे पुढे करत या प्रश्‍नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न पत्रकार परिषदेत केला. मात्र, तेव्हाही त्यामधील फोलपणा त्यांच्या देहबोलीतून जाणवत होता. आणखी एक प्रश्‍न हा की, अजित पवार यांनी सर्वस्व पणाला लावून, फेकलेल्या या फाशांमधून त्यांच्या हाती नेमके काय लागले, हा आहे. त्यांचे आततायी वागणे अवघ्या महाराष्ट्राने गेल्या काही दिवसांत पाहिले आहे. त्यांच्या या मनमानी वर्तनामुळे एकीकडे भाजपची सत्ता गेली आणि दुसरीकडे ‘राष्ट्रवादी’ची प्रतिष्ठा. अर्थात, त्यांनाही आपले काका काय काय करू शकतात, हा धडा पुनश्‍च एकवार शिकायला मिळाला. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवे त्रिपक्षीय सरकार राज्यात स्थापन होणार आहे. आघाडीतील सर्वांना बरोबर घेऊन कारभार करताना राज्यापुढील अनेक प्रश्‍नांची आव्हाने त्यांच्यासमोर असतील. राजकीय सत्तासंघर्षात दुखावलेला भाजप विरोधक म्हणून नक्कीच कडवे आव्हान त्यांच्यापुढे उभे करेल. या सरकारला देवेंद्र फडणवीस यांनी भले शुभेच्छा दिल्या असल्या तरी, त्याचवेळी हे तीन चाकांचे सरकार फार काळ टिकणार नाही, असे भाकीतही वर्तवून ते मोकळे झाले आहेत. आपला अशा प्रकारचा अहंकार आपल्याला भोवला, हे भाजप नेत्यांच्या अद्यापही लक्षात आलेले नाही, याचीच हे भाकीत साक्ष आहे. एक मात्र खरे, महाराष्ट्रात गेले महिनाभर रंगलेल्या सत्तानाट्यावर आता पडदा पडला आहे. आता नवे सरकार कसा कारभार करते, त्याबाबत मात्र सर्वांच्याच मनात कमालीची उत्सुकता आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com