मुंबईत जमावबंदी; कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पाऊल 

mumbai-gatewayofindia
mumbai-gatewayofindia

मुंबई - कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने राज्य सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मुंबई शहरात जमावबंदीचा (कलम १४४) आदेश लागू केला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांनी अनावश्‍यक गर्दी टाळावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मोठे समारंभ, गर्दी आणि अनावश्‍यक प्रवास टाळावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. पाचपेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र जमण्यावर पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख गृह विभागाशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. 

राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी न देण्याचा आणि पूर्वी दिलेली परवानगी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आणि विनाकारण प्रवास न करण्याचे आवाहनही सरकारने केले आहे. 

पर्यटन कंपन्यांना देशात आणि परदेशांत समूह सहली काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबई दर्शन सहलीही ३१ मार्चपर्यंत थांबविण्यात आल्या आहेत. 

कलम १४४ म्हणजे काय? 
फौजदारी दंड संहितेमधील (१९७३) कलम क्र. १४४ नुसार चार किंवा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी घातली जाते. मोठ्या संख्येने जमाव झाल्यास, त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतल्यास अथवा मानवी जीव आणि आरोग्याला धोका असल्यास हे कलम लागू केले जाते. कोणत्याही भागात दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ जमावबंदी करता येत नाही. दोन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुन्हा जमावबंदीचा आदेश काढता येतो. नागरिकांच्या जीवित व आरोग्याला धोका आणि दंगलीची शक्‍यता असल्याचे सरकारला वाटल्यास जमावबंदी सहा महिन्यांपर्यंत लागू केली जाऊ शकते. सध्याचे आदेश ३१ मार्चला मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू असतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com