शाळा संपली, पण सुटी हरवली ; स्पर्धेच्या नावाखाली मुले विविध शिबिरांत व्यग्र

Students are busy in different camps in the name of competition
Students are busy in different camps in the name of competition

कोल्हापूर : शाळा संपून उन्हाळी सुटी लागली, की मामाच्या गावाला जाणं हा अगदी वस्तुपाठ. मामाचा गाव म्हणजे मौज, मजा, मस्ती करत आनंद लुटणं; पण हे चित्र आता बदललं आहे. वाढती स्पर्धा, करिअरच्या नावाखाली मुले दबली जाऊन त्यांची उन्हाळी सुटी हरवत आहे. मामाच्या गावाला जाऊन रानावनात भटकून रानमेवा गोळा करणे, तो आनंदाने वाटून खाणे या नैसर्गिक संस्कारांबरोबरच नाती-गोती, प्रेम, जिव्हाळ्याला मुले मुकत आहेत. सुटीत मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक असा सर्वांगीण विकास होऊन व्यक्तिमत्त्व विकसित होत असते. त्याऐवजी आता केवळ बौद्धिक विकास होताना व्यक्तिमत्त्व मात्र मर्यादित स्वरूपात घडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

वर्षभर केलेल्या अभ्यासाचा शिण घालवण्यासाठी उन्हाळ्याची सुटी असते. खेळ आणि निसर्गाच्या सहवासात सकारात्मक ऊर्जा मिळवून मुले वर्षभर पुन्हा नव्या अभ्यासासाठी सज्ज होत असत. आता मात्र चित्र बदलले आहे. नैसर्गिक आनंदपासून लांब राहत वेगवेगळे अभ्यासक्रम, शिबिरांत मुले व्यग्र होत आहेत. पालकांत मुलांच्या करिअरविषयी वाढती अतिजागरुकता यामुळे ते मुलांना सतत व्यग्र ठेवत आहेत; तर बदलत्या जीवनपद्धतीत पालकांकडे मुलांसाठी वेळच नसल्याचे दिसते. अनेक पालक मनोरंजनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसतात. त्याचेही प्रतिबिंब मुलांवर पडत असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. 

याबाबत काही पालक-शिक्षकांसोबत संवाद साधला असता, सचिन यादव म्हणाले, ""आम्ही लहान असताना जास्तीत जास्त मैदानावर असायचो. खेळाचा मनमुराद आनंद लुटायचो. मनसोक्त पोहणे, मामाच्या गावाला जाऊन रानमेवा गोळा करून खात असू. अनोळखी मुलांत एकरूप होऊन खेळत असू. दिवसभर क्रिकेट, फुटबॉल आणि रात्री आटापाट्या, लगोरी खेळ खेळत असू. आमची मुले मात्र टीव्ही, मोबाईलमध्येच रमली आहेत. फिरायला गेले तरी तेथील माहिती घेण्यापेक्षा सेल्फीवरच त्यांचा भर असतो. 

कोल्हापूरच्या गोखले महाविद्यालयाचे रजिस्ट्रार विलास जौंदाळ म्हणाले, ""उन्हाळी सुटीतील मौजमजा इतिहासजमा झाली आहे. पालक मुलांना वेगवेगळ्या शिबिरांना घालतात. तेथून पुरेसे ज्ञान मिळतेच असे नाही. खेळांतून मुलांचे जे व्यक्तिमत्त्व घडते ते अशा शिबिरांतून घडतेच असे नाही. खेळामुळे प्रकृती उत्तम राहते. प्रतिकार शक्ती वाढते. 

सुटीतही परीक्षांत व्यस्त 

बारावी विज्ञान शाखेतून परीक्षा दिलेली विद्यार्थिनी ऋतुजा सासने म्हणाली, ""बारावी परीक्षेनंतरही आम्हा विद्यार्थ्यांना सीईटी, जेईई, नीट अशा विविध पात्रता परीक्षा द्यावा लागल्या. त्यांच्यावर आमचे करिअर ठरत असल्याने सुटीतही अभ्यास करावा लागला. सुटीचा आनंद घेताच येत नाही.'' 

देशी खेळ शिबिरापुरते 

बदलत्या तंत्रज्ञानामुळे खेळाचे स्वरूपही बदललेले. मुलांना तंदुरुस्त करणारे सूर-पारंब्या, लंगडी, कबड्डी, आट्यापाट्या, विटी-दांडू, पोहणे यांसारखे देशी खेळ ग्रामीण भागातूनही लुप्त होत आहेत. काही शिबिरांत ते शिकविले जातात; मात्र चार दिवसांपुरतेच. मुलांना चपळ, तंदुरुस्त, धाडसी, मानसिक सक्षम बनविणारे हे खेळ टिकवून ठेवणे आवश्‍यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com