साखर उत्पादन घटणार

साखर उत्पादन घटणार

पुणे - यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यात पुढील हंगामात उसाच्या क्षेत्रात २८ टक्‍क्‍यांनी घट होणार असून, साखर उत्पादनातही तेवढीच घट होईल, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. 

गेल्या वर्षी उसाचे क्षेत्र ११ लाख ६२ हजार हेक्‍टर होते. पुढील हंगामात ते घटून ८ लाख ६२ हजार हेक्‍टरवर येईल. यात पावसाच्या प्रमाणानुसार थोडाफार बदल होईल, असे सांगून गायकवाड म्हणाले, ‘‘गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा साखरेचे सर्वाधिक उत्पादन १०७.२१ लाख टन झाले. नुकत्याच संपलेल्या हंगामात शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर दरापोटी (एफआरपी) २३ हजार ३०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. सुमारे ९४ टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. ‘एफआरपी’ न देणाऱ्या कारखान्यांवर महसुली जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. 

‘एफआरपी’ऐवजी काही कारखान्यांनी शेतकऱ्यांसोबत तीन टप्प्यांत पैसे देण्याचा करार केला आहे. परंतु, कारखान्यांनी ही रक्कम त्यानुसार दिली पाहिजे. तसेच, ही रक्कम १४ दिवसांत देणे बंधनकारक आहे. कारखान्यांनी ही रक्कम न दिल्यास त्यांना शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची रक्कम १५ टक्के व्याजासहित द्यावी लागणार आहे.’’  

इथेनॉलनिर्मितीवर भर 
गेल्या हंगामात ३२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. ही साखर दोन वर्षे पुरेल एवढी आहे. साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे इथेनॉलनिर्मितीवर भर देण्यात येत असून, या संदर्भात साखर आयुक्तालयाकडून मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव देण्यात आला आहे. सरकारने इथेनॉलच्या किमान दहा वर्षांची दराची हमी द्यावी, किमान दर ठरवून घ्यावेत, अशी इथेनॉल उत्पादकांची मागणी आहे. 

राज्यात २००९ मध्ये खासगी साखर कारखान्यांची संख्या २८ होती. ती आता ९३ वर पोचली आहे. राज्यात एकूण १९५ साखर कारखान्यांपैकी ९३ कारखाने खासगी आहेत. यापुढील काळात खासगी कारखान्यांची संख्या आणखी वाढेल. 
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com