Ajit Pawar : बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करा

‘राज्यात ठिकठिकाणी पावसास सुरुवात झाली असून शेतकरीही खरीप पिकांच्या पेरणीसाठी तयारीला लागले आहेत.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal

मुंबई - ‘राज्यात ठिकठिकाणी पावसास सुरुवात झाली असून शेतकरीही खरीप पिकांच्या पेरणीसाठी तयारीला लागले आहेत. त्यामुळे या काळात बनावट बियाणे विक्रेते सापडले तर त्यांच्यावर कडक कारवाई करा,’ असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सर्व विभागीय आयुक्तांना दिले. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची दक्षता घ्यावी, असा सूचनाही त्यांनी दिली.

अजित पवार यांनी त्यांच्या मंत्रालयीन दालनात आज राज्यातील पाऊसमान, खते, बी-बियाणे पुरवठा, पीक कर्ज वितरण, टँकरची स्थिती, धरणांतील पाणीसाठा व विसर्गाचे नियोजन, पूर नियंत्रण, चारा उपलब्धता याबाबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला. बैठकीला महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, आपत्ती व्यवस्थापनाचे संचालक लहूराज माळी, कृषी विभागाचे उपसचिव चांदवले आदी उपस्थित होते.

तसेच पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, अमरावती विभागीय आयुक्त निधी पांडे तसेच नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोकण विभागाचे उपायुक्त यांच्यासह कृषी सहसंचालक रावसाहेब भाबडे यांनी त्यांच्या विभागाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

‘हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्यामुळे धरणांमधील पाणी सोडण्याचे काटेकोर नियोजन करावे. आंतरराज्य धरणांवर जलसंपदा विभागाने आपला समन्वय अधिकारी नियुक्त करावा, त्याच्या माध्यमातून योग्य वेळी पाण्याच्या विसर्गाबाबत नियोजन करावे.

पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन शहरे, गावांत पाणी येणार नाही याची काळजी घ्यावी. अलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे कोल्हापूर शहरात पुराची समस्या येऊ नये, यासाठी आतापासून नियोजन करावे. तसेच मेडिगट्टा, गोसीखुर्द धरणाबाबतही दक्ष राहून गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही याबाबत काळजी घ्यावी,’ असे निर्देशही त्यांनी दिले.

पुणे महापालिकेला सूचना

पवार म्हणाले, ‘‘पहिल्याच पावसात पुणे शहरातील विविध भागात पाणी साचल्याचे दिसून आले. महापालिकेने याबाबत त्वरित आवश्यक उपाययोजना कराव्यात. मोठ्या पावसात पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक नियोजन करावे. राज्यात काही भागात १०० मिलिमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडला आहे. अशा परिस्थितीत वापसा आल्यानंतरच पेरण्यांचे नियोजन करावे.’’

पाणी सोडण्याचे नियोजन करा

जलसंपदा विभागाने धरणांमधील पाणी सोडण्याबाबत योग्य ते नियोजन करावे. याबाबत अन्य यंत्रणांशी समन्वय ठेवावा. शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर उपलब्ध होईल याबाबत बँकांना सूचना द्याव्यात, असेही अजित पवार यांनी सांगितले. पुलकुंडवार यांनी आषाढी वारीच्या नियोजनाबाबत माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com