
Thackeray Vs Shinde : सत्तासंघर्षाचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार? 'हे' मुद्दे ठरणार निर्णायक
Thackeray Vs Shinde Maharashtra power struggle : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाकडे देशाचे लक्ष लागले आहे. यादरम्यान आज सुप्रीम कोर्टाच्या पाच न्याधीशांच्या खंडपीठाने तीन दिवसांच्या सुनावणीनंतर आज निकाल जाहीर केला. यावेळी या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २१ आणि २२ फेब्रुवारीला सकाळी साडे दहा वाजता होणार आहे.
आजच्या निकालात सात सदस्यीय खडंपीठाकडं या प्रकरणाची सुनावणी व्हावी, ही ठाकरे गटाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. तसेच या खटल्यातील मेरिटनुसार यावर निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळं तुर्तास हे प्रकरण आता सात सदस्यीय खंडपीठासमोर जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
दरम्यान या सुनावणी सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे गेली असती तर निकालासाठी जास्त वेळ लागला असता असे मत कायदेतज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यानंतर आता न्यायालयासोर अजून बरेच प्रश्न बाकी आहेत.
आता सध्याच्या खटल्यातील मेरिट्स लक्षात घेऊन याचा निर्णय घेण्यात येणार आहे. सात न्यायाधिशांच्या खंडपीठाकडे सुनावणी गेली असती तर सुनावणीला वेळ लागला असता आणि सरकार अस्थिर असताना सुनावणीला वेळ लागणे योग्य ठरणार नाही असे घटनातज्ञ उल्हास बापट यांनी सांगितले.
घटल्यात या मुद्द्यांवर खुलासा अपेक्षित
घटनातज्ञ उल्हास बापट यांनी न्यायालयासमोर कोणते प्रश्न असणार आहेत याबद्दल माहिती दिली आहे त्यांनी सांगितलेले मुद्दे पुढीलप्रमाणे..
आता पाच न्यायाधीशांपुढे सुरू असलेली सुनावणी सलग सुरू राहाणार आहे. दिलेला निर्णय महाराष्ट्रापुरता बंधनकारक आहे.
सुप्रीम कोर्टाला पक्ष सोडला याचा अर्थ काय हे ठरवावं लागेल. स्वखुशीने पक्ष सोडला तर अपात्रतेची कारवाई होते, त्याचा अर्थ शोधावा लागेल
दोन तृतीअंश लोक एकाचवेळी बाहेर जावे लागतात की हळूहळू गेले तरी चालतील हे ठरवावे लागेल.
गट बाहेर पडल्यावर दुसऱ्या पक्षात विलनीकरण अनिवार्य आहे का हे ठरवावे लागेल.
तसेच सभापतींचे अधिकरांवर अविश्वासाचा ठराव आल्यानंतर काही परीणाम होतात का, की बुद्धीबळाचा खेळ चालतो ते पाहावे लागेल.
राज्यपालांचे अधिकार फक्त काही बाबतीत आहेत, इतर वेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने काम पाहणे अपेक्षित असते ते देखील पाळलं गेलं नाही.
सुप्रीम कोर्टानं नेमका निकाल काय दिला?
सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं एक पानी निकाल वाचताना सांगितलं की, नबाम रेबिया प्रकरणाचा निकाल तपासण्यासाठी मोठ्या खंडपीठाकडं अर्थात ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडं हे प्रकरण पाठवायचं की नाही हे या खटल्याच्या मेरिट्सवर ठरवलं जाईल. याची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता होईल.
पुढील सुनावणीत काय होणार?
पुढील सुनावणीत आता इतर मुद्द्यांवरील याचिकांवरही सुप्रीम कोर्टात नियमित सुनावणी होणार आहे. ही सुनावणी ५ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडेच होणार आहे. यामध्ये नबाम रेबिया प्रकरणाव्यतिरिक्त इतर मुद्देही घटनापीठ ऐकणार आहे.
तीन दिवस झालेल्या युक्तीवादामध्ये नबाम रेबिया प्रकरणावरच प्रामुख्यानं चर्चा झाली. त्यानंतर काल आणखी काही मुद्दे समोर आले होते. त्यामुळं वेळ पुरेसा नसल्याचं सांगत खंडपीठानं याची आणखी सुनावणी होणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडं द्यायचं का यावर निकाल दिला जाईल.