mahatma basweshwar
sakal
- अशोक खानापुरे, २१ ब नंदीकेश नगर शेळगी, सोलापूर.
बसवेश्वरांच्या विचारांची आजही गरज आहे. संपूर्ण समाजाला एकसंध व सुखी करण्याचा एकमेव उपाय म्हणजे बसवेश्वरांच्या सामाजिक क्रांतीचे विचार आचरणात आणणे. अशा या थोर सामाजिक क्रांतिकारकाचा परिचय करून देणारा हा लेख...
पृथ्वीतलावर ज्या ज्या वेळी अन्याय व अत्याचार वाढला, त्या त्या वेळी महान संतांचा उदय झाला. बाराव्या शतकात कर्मकांडाला ऊत आला होता. अस्पृश्यांना भक्तीचे द्वार बंद होते. पुरोहितांचा अहंकार वाढला, कर्मकांड बोकाळले. स्पृश्य-अस्पृश्य व गरीब-श्रीमंत भेद पराकोटीला गेले. भक्तीचा खरा मार्ग सोडून भक्तीचे अवडंबर वाढले. धर्माच्या नावावर शोषण प्रवृत्ती वाढली. माणुसकीचा लोप होऊन अधर्माचा अंधकार वाढला. नैतिकतेचे अधःपतन झाले. स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हते, स्त्रियांकडे कुदृष्टीने पाहत होते. मद्य व जुगाराचे प्रस्थ वाढले. लोकांत चोरी, हत्या, असत्य भाषण, क्रोध, तिरस्कार, आत्मस्तुती, परनिंदा, द्रव्याचा लोभ, व्यभिचार व अनैतिक आचरण वाढले. पुण्यकर्म व सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली. पाप व दुष्कर्म करण्यात प्रौढी वाढली. अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर बोकाळली. अस्पृश्यांचे जीवन कष्टप्रद होते. आर्थिक विषमता वाढली. वर्णव्यवस्थेचे वर्चस्व होते. धर्माला ग्लानी आली होती.
यावेळी लोकांना भक्तीचा खरा मार्ग व धर्माचा खरा अर्थ सांगणारे महात्मा बसवेश्वरांचा उदय झाला.