‘अंतरा’ अन्‌ ‘छाया’ची कमाल! ‘हम दो हमारे दो’ला कुटुंब नियोजनाची साथ

लोकसख्या नियंत्रणासाठी केंद्र सरकारने ‘हम दो हमारे दो’ हे सूत्र स्वीकारले आहे. त्यानुसार देशाचा प्रजनन दर हा २.१ असावा असे अपेक्षित आहे. पण, आरोग्य विभागाच्या अहवालानुसार महाराष्ट्राचा प्रजनन दर १.६ असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
family planing
family planingesakal

सोलापूर : लोकसख्या नियंत्रणासाठी केंद्र सरकारने ‘हम दो हमारे दो’ हे सूत्र स्वीकारले आहे. त्यानुसार देशाचा प्रजनन दर हा २.१ असावा असे अपेक्षित आहे. पण, आरोग्य विभागाच्या अहवालानुसार महाराष्ट्राचा प्रजनन दर १.६ असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. कुटुंब नियोजनाचे सर्व कार्यक्रम शहराबरोबरच ग्रामीण भागातही प्रभावीपणे अंमलात आणल्याने आणि बरेच सुशिक्षित पालक ‘हम दो हमारा एक’ म्हणून कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करीत असल्याचे चित्र आहे.

लोकसंख्या वाढल्याने बेरोजगारी वाढून गुन्हेगारीला वाव मिळतो. उपलब्ध साधनसामग्री लोकसंख्येच्या प्रमाणात नसल्याने अर्थव्यवस्थेवरील ताण वाढतो. सध्या देशात बेरोजगारी वाढली असून पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तरूण नोकरीच्या शोधात वणवण भटकत आहेत. मुलांचे शिक्षणही खूप महाग झाले आहे. स्पर्धेच्या काळात दोन-चार मुलांचा सांभाळ करणेही कठीण बनले आहे. हातावरील पोट असलेल्यांचे जगणे अवघड झाले आहे. त्यातच दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्यांना सरकारी नोकरी नाही, राजकारणात येता येत नाही, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. या पार्श्वभूमीवर अनेकजण स्वत:हून कुटुंब नियोजन करीत आहेत. त्यासाठी महापालिकेचे दवाखाने, नागरी आरोग्य केंद्रे, ग्रामीणमधील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांमध्ये कुटुंब नियोजनासाठी लागणारी औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अंतरा इंजेक्शन (प्रत्येक तीन महिन्यातून एकदा), छाया गोळी (आठवड्यातून एकदा), निरोध, मालायन गोळी (दररोज एक) आणि तांबी बसवून महिला व पुरुष कुटुंब नियोजन करीत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणात आल्याचा दावा सार्वजनिक आरोग्य विभागाने केला आहे.

प्रजनन दर १.६ झाला
कुंटुंब नियोजन करणाऱ्यांना दर तीन महिन्याला ‘अंतरा’ इंजेक्शन पुरविले जातात. तर आठवड्याला घ्यायच्या ‘छाया’ गोळ्याही सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आरोग्य यंत्रणांना दिल्या जातात. निरोध, मालायन व तांबी याचाही लोक वापर करीत आहेत. त्यामुळे सध्याचा आपला प्रजनन दर १.६ पर्यंत खाली आला आहे.
- डॉ. दिगंबर कानगुले, सहसंचालक, सार्वजनिक आरोग्य, पुणे

दहा जिल्ह्यात मुलींची संख्या कमीच
राज्याच्या अहवालानुसार ३५ पैकी २५ जिल्ह्यांमध्ये मुलांच्या प्रमाणात मुलींची संख्या दरहजारी ९०४ ते ९७३ पर्यंत आहे. मुलींच्या जन्मदरात वाशिम जिल्हा अव्वल असून त्याठिकाणी एक हजार मुलांमागे ९७३ मुली, असे प्रमाण आहे. सिंधुदूर्ग, अमरावती, नागपूर, वर्धा, पालघर, रायगड, गडचिरोली, मुंबई या जिल्ह्यांमध्येही मुलींचे प्रमाण चांगले आहे. पण, नगर, धुळे, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, जालना, बीड, उस्मानाबाद, बुलढाणा व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मुलींचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत खूप कमी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com