महिला व बालविकास विभागाने एक प्रस्ताव तयार केला असून तो बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार आहे.
माळीनगर (सोलापूर) : कोरोनाच्या (Covid-19) काळात राज्यातील जवळपास साडेचार हजार बालके अनाथ झाली आहेत. पालकांचे छत्र हरवलेल्या या अनाथ बालकांच्या (Orphans children) मदतीसाठी राज्याच्या महिला व बालविकास विभागाने (Department of Women and Child Development) एक प्रस्ताव तयार केला असून तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. (The state government will pay for the education of orphans children)
गतवर्षीपासून जगभरात सुरू असलेली कोरोनाची साथ ही असामान्य परिस्थिती असून यावर्षी ती अधिकच गंभीर बनली आहे. कोरोना कालावधीत कोरोना किंवा अन्य कारणाने माता- पिता असे दोन्ही पालक बळी पडल्याने अनेक मुले अनाथ झाली आहेत. या मुलांचा शोध घेणे, त्यांना मदत पोचविणे, त्यांच्या पुनर्वसनासाठी जिल्हास्तरावर जिल्हा कृती बल (टास्क फोर्स) गठीत करण्यात आले आहे. त्या माध्यमातून 18 वर्षांपर्यंतच्या अनाथ बालकांचा सर्व्हे करण्यात आला.
कोकण (Konkan), पुणे (Pune), नाशिक (Nashik), अमरावती (Amravati), नागपूर, औरंगाबाद (Aurangabad) या विभागातील एकूण चार हजार 451 बालके 30 मे 2021 अखेर अनाथ झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये वडिलांचे छत्र गमावलेल्यांची संख्या अधिक आहे. कोरोना काळात फक्त वडील गमावलेल्या बालकांची संख्या तीन हजार 707, फक्त आई गमावलेली 603 व आईवडील दोन्ही गमावलेली 141 बालके आहेत. औरंगाबाद विभागात सर्वाधिक एक हजार 178 तर पुणे विभागात एक हजार 90 बालके अनाथ झाली आहेत.
कोव्हिड काळात दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या बालकांच्या नावे पाच लाख रुपये मुदत ठेव ठेवून त्यावर येणारे व्याज त्या बालकांना मिळत राहावे तसेच एक पालक गमावलेल्या बालकांना "बाल संगोपन' योजनेत समाविष्ट करून त्यांना दरमहा दोन हजार 500 रुपये मदत मिळावी, असा प्रस्ताव महिला व बालविकास विभागाने तयार केला आहे. या विभागाच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या प्रस्तावावर चर्चा केली आहे. अनाथ बालकांच्या शिक्षणाचा खर्च राज्य सरकार करणार आहे. याबाबत शिक्षण विभागाचेही मत घेतले जाणार आहे.
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांबाबत बुधवारी (ता. 2) कॅबिनेट बैठकीत निर्णय होईल. मुख्यमंत्री अनाथ बालकांना दत्तक घेणार म्हणून बोलले आहेत. आई-वडील गमावलेल्या मुलांच्या नावे पाच लाख रुपये ठेव तर दोन्ही पालकांपैकी एक बळी ठरलेल्यांच्या मुलांना दरमहा अडीच हजार रुपये देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जाणार आहे.
- यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री
अनाथ बालकांची 30 मे अखेरची आकडेवारी
विभाग : अनाथ झालेली बालके - आई - वडील - आईवडील
कोकण : 452 - 53 - 372 - 27
पुणे : 1090 - 137 - 917 - 36
नाशिक : 567 - 99 - 448 - 20
अमरावती : 347 - 67 - 266 - 14
नागपूर : 817 - 89 - 706 - 22
औरंगाबाद : 1178 - 158 - 998 - 22
एकूण : 4451 - 603 - 3707 - 141
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.