अस्मानी थैमानाचे 30 बळी

Thirty people victims of the rains across the state
Thirty people victims of the rains across the state

पुणे - राज्यातील अनेक जिल्ह्यांत बुधवारी (ता. २५) पावसाने दाणादाण उडवली. पुणे शहर व जिल्ह्यात मध्यरात्री पावसाने अक्षरश- थैमान घातले. यात शहरात पाच महिलांसह १२ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूरमध्ये सहा जण वाहून गेले. पुरंदर तालुक्‍यातील भिवडी येथे नाल्याच्या पुरात दोन महिला वाहून गेल्या. त्यांचे मृतदेह नंतर सापडले. नाशिकमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर जळगाव जिल्ह्यात वीज पडून पाच जण व धुळ्यात दोन जण मृत्युमुखी पडले. राज्यभरात पावसाच्या बळींची संख्या ३० वर गेली आहे. दरम्यान, पुढील ४८ तासांत जोरदार पाऊस पडेल, असा वेधशाळेचा अंदाज आहे.


पुणे शहर व जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान; राज्यभरात पाऊस
पुणे शहरात काल अवघ्या अडीच तासांत ४७ मिलिमीटर पावसाचा तडाखा बसला. शेकडो वाहने वाहून गेली. हजारो घरांत पाणी शिरले. अरण्येश्‍वर भागातील टांगेवाला कॉलनीमध्ये सोसायटीची सीमाभिंत कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. तावरे कॉलनीमध्ये एक मृतदेह वाहत आला; तर सिंहगड रस्ता, कात्रज, घोरपडी, वानवडी येथील घटनांत सहा नागरिक वाहून गेले. रात्री आठ वाजेपर्यंत पोलिसांना ११ मृतदेह सापडले होते. सुमारे ३५०० कुटुंबांना महापालिकेने सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळित झाले.

शहरात बुधवारी रात्री दहाच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरवात झाली. त्याचा जोर वाढत गेला. त्यामुळे रस्त्यांना ओढे, नाल्यांचे स्वरूप आले. दक्षिण पुण्यात कात्रज, सुखसागरनगर, आंबेगाव, संतोषनगर, सहकारनगर, पद्मावती, अरण्येश्‍वर, पर्वतीदर्शन, अरण्येश्‍वर, तावरे कॉलनी, दांडेकर पूर, सिंहगड रस्ता, धायरी, कोंढवा आदी परिसराला पावसाचा विशेष तडाखा बसला. त्यातच शहरातील ७२ नाल्यांनाही पूर आला. त्यामुळे दुतर्फा वसलेल्या घरांत पाणी शिरले. कात्रज भागातून सुरू होणाऱ्या आंबिल ओढ्यात पाणी कात्रज तलावातून येते. हा तलाव फुटल्याची अफवा मध्यरात्री पसरली. त्यामुळे रहिवासी हवालदिल झाले. जवळजवळ निम्मे पुणे मध्यरात्री पाण्यात होते. त्यातच अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

शहरातील प्रमुख चौकांत पाणी साठल्यामुळे ते मध्यरात्री वाहतुकीसाठी बंद झाले होते. त्यामुळे नागरिकांनी जमेल त्या ठिकाणी वाहने उभी केली अन्‌ पायी घरी जाणे पसंत केले. गुरुवारी सकाळी महापालिका प्रशासन, अग्निशमन दलाकडून मदतीची प्रक्रिया सुरू झाली अन्‌ सायंकाळनंतर जनजीवन पूर्ववत झाले.

परतीच्या पावसाचे नाशिकमध्ये तीन बळी
नाशिक- जिल्ह्यात दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. मालेगावला दोन जण बुडाले. नाशिकला विजेचा प्रवाह उतरल्याने रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. याशिवाय, पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले. शंभर टक्के धरणसाठा भरलेल्या जिल्ह्यातील १९ धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरणगाव तालुक्‍यात वीज पडून पाच ठार  
धरणगाव (जि. जळगाव)  - भवरखेडे (ता. धरणगाव) येथे वीज पडून एकाच कुटुंबातील चार जण, तर अन्य एका शेतमजूर महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. पाटील कुटुंबीय शेतात बाजरी कापण्यासाठी गेले होते. शेतातील एका झोपडीत डबे खात असताना अचानक झोपडीवर वीज कोसळल्याने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. विवरे आणि भवरखेडे या दोन गावांच्या मध्यभागी असलेल्या नागीन नदीस मोठा पूर आल्याने मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यासाठी अडचण आली होती. ज्या शेतात घटना घडली तेथे पावसामुळे ट्रॅक्‍टर जाऊ शकत नव्हते. रस्त्यावर ट्रॅक्‍टर उभे करून मृतदेह जेमतेम भर पावसात उचलून आणले.  

अंगावर वीज कोसळून धुळ्यात दोन युवती ठार
धुळे - पुरमेपाडा (ता. धुळे) येथे आज दुपारी काही युवती कपडे धुण्यासाठी बोरी नदीवर गेल्या होत्या. नदीवरून परत येत असताना दुपारी दोनच्या सुमारास मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट सुरू झाला. यात युवतींनी सुरक्षित आश्रयस्थळ गाठण्यापूर्वीच यातील दोन युवतींच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. दोन्ही मृत युवती चुलत बहिणी होत्या. अन्य एक युवती जखमी झाली असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पावसाची शक्यता
दक्षिण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि अरबी समुद्र या परिसरात चक्रावाताची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर आहे. यामुळे शुक्रवारी (ता.२७) आणि शनिवारी (ता.२८) कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रातही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असून मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

सातारा  
 जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
 पिकांचे नुकसान

सोलापूर 
 पंढरपूरमध्ये चंद्रभागेत भाविक वाहून गेला
 टॅंकर नदीत पडून दोघे बेपत्ता 

नगर
 तीन मंडळांत वृष्टी
 सीना धरणातील पाणीसाठ्यात वाढ

नाशिक
 जिल्ह्यात पावसाचे 
   तीन बळी
 द्राक्ष उत्पादक संकटात

खानदेश
 विभागात संततधार
 कापूस पिकाला फटका

मराठवाडा
 औरंगाबाद शहरात 
    ‘हाय अलर्ट’
 जायकवाडीतून विसर्ग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com