
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घाबरले म्हणून...- नवनीत राणा
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा चंगच बांधला होता. मात्र त्यांच्या या निर्णयामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी रात्रभर त्यांच्या घराबाहेर पहारा दिला आणि त्यांच्याविषयीची संताप व्यक्त केला. त्यानंतर आत्ताच काही वेळापूर्वी आपण आपला निर्णय मागे घेत असल्याचं राणा दाम्पत्याने सांगितलं.
या निर्णय़ानंतर माध्यमांशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, आज बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिलेली नाही. आजची शिवसेना म्हणजे गुंडसेना आहे. या सगळ्या गुंडांना उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली आणि आपल्या सगळ्या गुंडांना आणि शिवसैनिकांना आमच्यावर हल्ला करण्यासाठी तयार राहायला सांगितलं. माझा उद्धव ठाकरेंना एक प्रश्न आहे, त्यांनी शिवसैनिकांना हल्ल्यासाठी तयार राहायला सांगितलं, उद्धव ठाकरे जर घाबरले नाहीत तर त्यांनी का पोलिसांचा आधार घेतला? आमच्यासोबत येणारे कार्यकर्ते हनुमानाचे भक्त होते, रामभक्त होते. ज्यावेळी आम्हाला पोलिसांनी नोटिस दिली, तेव्हा आम्ही जर एवढा समजूतदारपणा दाखवून येणाऱ्या सगळ्या लोकांना तिथेच थांबवलं. एवढ्या शांततेने आम्ही पावलं उचलली. पण ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गुंड पाठवून आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला..अरे आम्ही राज्याच्या भल्यासाठी हनुमान चालिसा पठण करत आहोत.
हेही वाचा: उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार विसरले, पण आम्ही... : रवी राणा
नवनीत राणा पुढे म्हणाल्या, "मुख्यमंत्री राज्यभरात गेले नाहीत, शेतकऱ्यांना भेटले नाहीत, एसटी कर्मचाऱ्यांशी बोलले नाहीत, राज्यातल्या परिस्थितीविषयी एक शब्द बोलले नाहीत. मग हनुमान चालिसालाच एवढा विरोध का? ज्या नावाने, ज्या विचारधारेने तुम्ही, तुमचे पुत्र मंत्री झाले, त्या विचारधारेला तुम्ही सोडलेलं आहे. रामाला, हनुमानाला मानणारे जे लोक आहेत ते येत्या काही दिवसांत गोव्यामध्ये जी तुमची परिस्थिती झाली, नोटापेक्षा कमी मत देऊन तुमचा तिरस्कार केला, तशीच परिस्थिती महाराष्ट्रातही शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना दाखवून देतील. "
हेही वाचा: हनुमान चालीसा पठणाचा विषय तापला, राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी शिवसेना आक्रमक
"जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोलिसांच्या आड लपले नसते तर पूर्ण महाराष्ट्रात आम्हाला अडवण्याची हिंमत कोणामध्ये नव्हती आणि घाबरणारे जर कोणी असतील तर ते उद्धव ठाकरे आहेत. जर घाबरलो असतो तर अमरावतीवरून मुंबईपर्यंत आम्ही पोहोचलो नसतो.", असंही नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
Web Title: Uddhav Thackeray Got Scared Says Navneet Rana
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..