‘उजनी’ मायनस ३६ टक्के! ‘या’ ५ शहरांवर पाणी टंचाईची गडद छाया; मायनस ५६ टक्क्यांपर्यंत पाणी खाली गेल्यास टंचाई

मायनस ५६ टक्क्यांपर्यंत धरणाची पाणीपातळी खालावल्यावर सोलापूर शहर, करमाळा, बार्शी, कुर्डुवाडी, बारामती एमआयडीसीसह धाराशिवच्या पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होणार आहे. ही शहरे पाणी टंचाईच्या गडद छायेखाली येणार आहेत.
sakal-exclusive
sakal-exclusivesakal
Updated on

सोलापूर : उजनी धरणात सध्या मृत पाणीसाठा ४४.२८ टीएमसीपर्यंत आहे. धरण मायनस ३६ टक्क्यांवर पोचले आहे. पावसाळा सुरु असूनही धरणातील पाणी पातळी खालावत असल्याने पाणी टंचाईची शक्यता बळावली आहे. मायनस ५६ टक्क्यांपर्यंत धरणाची पाणीपातळी खालावल्यावर सोलापूर शहर, करमाळा, बार्शी, कुर्डुवाडी, बारामती एमआयडीसीसह धाराशिवच्या पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होणार आहे. ही शहरे पाणी टंचाईच्या गडद छायेखाली येणार आहेत.

उजनीच्या बॅक वॉटवर जवळपास ६० हून अधिक पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत. धरणाची पाणीपातळी मायनस ३० टक्क्यांवर पोचली की कॅनॉल, बोगदा, उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडणे बंद होते. दुबार, तिबार पंपिंग करून काही शहरांना पाईपलाइनमधून पाणी न्यावे लागते. सोलापूर महापालिकेने दुबार पंपिंग सुरु केले आहे.

सोलापूर शहराचा पाणीपुरवठा उजनीवरच अवलंबून असून नागरिकांची तहान भागविण्यासाठी स्वत:चा कोणताही शाश्वत स्त्रोत महापालिकेकडे उपलब्ध नाही. आगामी २५-३० दिवस समाधानकारक पाऊस न झाल्यास धरणातून नदीद्वारे पाणी सोडावे लागेल, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. आता सर्वांना पावसाची प्रतीक्षा आहे. धरणात सध्या मृत पाणीसाठा ४४ टीएमसी आहे, पण त्यात १४ ते १६ टीएमसी गाळ आहे.

चिंतेची बाब म्हणजे धरण मायनस ७० टक्क्यांवर जाते, त्यावेळी नदीतून देखील पाणी सोडता येत नाही. एनटीपीसी प्रकल्प व इंदापूर शहराचा पाणीपुरवठा मात्र धरण मायनस ७० ते ७५ टक्के होईपर्यंत सुरु राहतो. पावसाचा अंदाज घेऊन धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवले जात आहे. त्यासंबंधीच्या सूचना वरिष्ठ पातळीवर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

मायनस पाणीसाठा अन्‌ शहरांवरील परिणाम

  • बारामती एमआयडीसी : मायनस ३६ टक्के

  • सोलापूर शहर : मायनस ५६ टक्के

  • करमाळा : मायनस ४३ टक्के

  • बार्शी-कुर्डुवाडी : मायनस ५६ टक्के

  • धाराशिव : मायनस ६२ टक्के

  • इंदापूर : मायनस ७० टक्के

  • एनटीपीसी : मायनस ७५ टक्के

गतवर्षी धरण मायनस १२ टक्क्यापर्यंतच...

आता पावसाळा सुरु होऊन २५ दिवसांचा कालावधी लोटला, तरीदेखील अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. तुरळक पावसाच्या ओलीवरच पेरणी सुरु आहे. दरम्यान, १५ जून रोजी धरणातील पाणीसाठा मायनस २८.३७ टक्के होता. सद्य:स्थितीत धरण मायनस ३६ टक्क्यांवर गेले आहे. मागील २५ दिवसांत धरणातील चार टीएमसी पाणी संपले आहे. मागील वर्षी धरण मायनस १२ टक्क्यांवर गेल्यानंतर पावसाला सुरवात झाली आणि धरण हळूहळू प्लसमध्ये आले होते. पण, यंदा धरण पावसाळा सुरु असतानाही मायनसमध्ये जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.