3 जिल्ह्याची वरदायिनी उजनी मायनसमध्ये! यंदा महिनाभर अगोदर धरणाने गाठला तळ; आता पाणी फक्त पिण्यासाठीच

सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासाठी वरदान असणार्‍या उजनी धरणाने तळ गाठला आहे. ५५ दिवसांत तब्बल ३३ टीएमसी पाणी संपले आहे. गतवर्षी १२ जूनला मायनसमध्ये गेलेले धरण यंदा ६ मे रोजी मानयसमध्ये जाणार आहे. पाऊस सुरु होईपर्यंत जिल्ह्याला पाणी टंचाईच्या छळा सोसाव्या लागतील.
उजनी धरण
उजनी धरणsakal

सोलापूर : सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासाठी वरदान असणार्‍या उजनी धरणाने तळ गाठला आहे. ५५ दिवसांत तब्बल ३३ टीएमसी पाणी संपले आहे. अडीच महिन्यांपासून कॅनॉल, बोगदा, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडणे सुरुच आहे. गतवर्षी १२ जूनला मायनसमध्ये गेलेले उजनी धरण यंदा आज मानयसमध्ये गेले आहे. त्यामुळे ६ मे ते पाऊस सुरु होईपर्यंत जिल्ह्याला पाणी टंचाईच्या छळा सोसाव्या लागणार आहेत.

उजनी धरणात १२० टीएमसीपर्यंत पाणीसाठा होण्याची मर्यादा आहे. पण, सध्या २० ते २२ टीएमसीपर्यंत गाळ आहे. त्यामुळे धरण मायनसमध्ये गेल्यानंतर ६४ टीएमसी पाणीसाठा राहतो. त्यापैकी ४० ते ४४ टीएमसीच पाणी असणार आहे. दरम्यान, २०१८-१९ मध्ये धरणातील मायनस २७ ते २८ टीएमसीपर्यंत पाणी वापरले होते. यंदाही तशीच वेळ येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.तरीपण, १५ जूनपर्यंत पाऊस सुरु झाल्यास मृत साठ्यातील १५ टीएमसीपर्यंत पाणी वापरावे लागेल, अशी स्थिती आहे. सध्या सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ४३३ क्युसेक, बोगद्यातून 560 क्युसेक व कॅनॉलमधून 2200 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे दररोज अर्धा टीएमसी पाणी संपत असून त्यात पुन्हा बाष्पीभवनाचाही फटका बसत आहे. त्यामुळे धरण आज (शनिवार) मायनसमध्ये जाणार आहे. सध्या धरणात 64 टीएमसी पाणी आहे.

(...तर धरणामधील पाणीसाठा पिण्यासाठीच राखीव) बोगदा व उपसा सिंचन योजनेतून सोडले जाणाऱ्या पाण्याचा विसर्ग सध्या पाणीपातळी घटत असल्याने कमी होऊ लागला आहे. साधारणत: १० मेपर्यंत कॅनॉलचे पाणी सुरू राहील. त्यानंतर मात्र बोगदा, कॅनॉल व उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडता येणार नाही.

(शहरासाठी 2 दिवसात भीमा नदीतून पाणी) सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यातून पाणी सोडले जाते. सध्या बंधाऱ्यात 8 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने जलसंपदा विभागाला पत्र दिले असून 10 जूनपर्यंत पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात भीमा नदीतून शहरासाठी धरणातून पाणी सोडले जाणार आहे. पाऊस लांबल्यास पुढे जूनमध्ये एकदा पाणी सोडले जाऊ शकते.

(यंदा महिनाभर अगोदर धरण मायनसमध्ये...)गेल्यावर्षी पावसाळा साधारणतः १५ ते २० जूनपासून सुरु झाला होता. त्यावेळी धरण हाऊसफुल्ल झाले आणि १२ जूनपर्यंत प्लसमध्येच होते. त्यानंतर आठ- दहा दिवस धरण मायनसमध्ये राहिले होते. त्यामुळे फार दिवस टंचाई जाणवली नाही. यंदा ६ मेपासून पावसाळा सुरू होईपर्यंत धरण मायनसमध्येच राहील, अशी स्थिती आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल ३६ दिवसांपूर्वीच धरण मायनसमध्ये जाणार असल्याने टॅंकरमुक्त जिल्ह्यात काही ठिकाणी टॅंकरची गरज भासेल, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com