जात प्रमाणपत्र पडताळणी करायचीयं का? जात प्रमाणपत्र असले तरी मिळेल वैधता प्रमाणपत्र; प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे ११ मार्चपर्यंत त्रुटी पूर्तता शिबिर

व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी, नोकरदार व निवडणूक लढविलेल्यांसह इतर, अशा जवळपास सातशे जणांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीच्या प्रस्तावांमध्ये त्रुटी आहेत. त्यांच्यासाठी समितीच्या वतीने ५ ते ११ मार्चपर्यंत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
जात वैधता प्रमाणपत्र
जात वैधता प्रमाणपत्रSakal

सोलापूर : व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी, नोकरदार व निवडणूक लढविलेल्यांसह इतर, अशा जवळपास सातशे जणांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीच्या प्रस्तावांमध्ये त्रुटी आहेत. त्यांनी अजूनपर्यंत त्रुटींची पूर्तता केली नसल्याने त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यांच्यासाठी समितीच्या वतीने ५ ते ११ मार्चपर्यंत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने २६ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक प्रमाणपत्र अभियान जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहीम राबविली जात आहे. सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीकडे दाखल सातशे प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. त्या सर्वांना ई-मेलद्वारे त्यासंबंधीची माहिती कळविली आहे. पण, आता त्यांना आजपासून (मंगळवार) ११ मार्चपर्यंत सात रस्ता परिसरातील समितीच्या कार्यालयात हजर राहून त्या त्रुटींची पूर्तता करता येणार आहे. सकाळी ११ ते ५ यावेळेत प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता या शिबिराच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यानंतर संबंधितांना काही दिवसांत जात वैधता प्रमाणपत्र मिळणार आहे.

जात पडताळणीसाठी दरमहा ३००० अर्ज

एसटी प्रवर्ग वगळता कुणबीसह इतर सर्व जातीच्या जवळपास तीन हजार उमेदवारांकडून दरमहा सोलापूर जिल्हा प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल होत आहेत. दरम्यान, ज्यांच्याकडे जात प्रमाणपत्र आहे, पण वैधता प्रमाणपत्रासाठी पुरेशी कागदपत्रे नाहीत, त्यांना जात पडताळणी समितीकडील दक्षता पथकाच्या माध्यमातून गृह चौकशी झाल्यानंतर प्राप्त अहवालानुसार प्रमाणपत्र वितरित केले जाते. त्यामुळे अशा व्यक्ती तथा विद्यार्थ्यांनी या शिबिरात लाभ घ्यावा, असे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.

४५ दिवसानंतर प्रस्ताव होतो रद्द

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी जिल्ह्याच्या समितीकडे अर्ज केल्यानंतर त्या प्रस्तावात त्रुटी असल्यास समितीकडून संबंधितांना १५ दिवसाच्या फरकाने तीनवेळा ई-मेलद्वारे कळविले जाते. ४५ दिवसांत संबंधित उमेदवाराने त्रुटींची पूर्तता न केल्यास तो प्रस्ताव बाद होतो आणि त्या उमेदवाराला पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करावा लागतो. त्यामुळे उमेदवारांनी त्रुटींची पूर्तता करण्यासाठी या शिबिराचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे सदस्य सचिव सचिन कवले यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com