सोलापुरातील ‘या’ भागाला सोमवारपासून ५ दिवसाआड पाणी! उजनी -६० टक्क्यांवर गेल्यास १० दिवसाला सुद्धा पाणी देणे कठीण, वाचा... पाणीपुरवठा योजना अन्‌ धरणाची पातळी

महापालिकेने धरण परिसरात 1 कोटी खर्चून दुबार पंपिंग सुरू केले आहे. पण, झपाट्याने खालावणाऱ्या पातळीमुळे उणे 50-55 टक्क्यांवर तिबार पंपिंग करावे लागेल. त्यासाठी 2 कोटींचा खर्च आहे. धरण उणे 60 टक्क्यांखाली गेल्यास सोलापूरचा पाणीपुरवठा 10-12 दिवसाआड होऊ शकतो.
Online Land Map
Online Land Mapsakal

सोलापूर : उजनी धरणातील पाणीसाठा सध्या उणे ३७ टक्क्यांवर आहे. सोलापूरचा पाणीपुरवठा सुरळीत राहावा म्हणून महापालिकेने धरण परिसरात एक कोटींचा खर्च करून दुबार पंपिंग सुरू केले आहे. पण, झपाट्याने खालावत असलेल्या पातळीमुळे उणे ५५ टक्क्यांवर तिबार पंपिंग सुरू करावे लागणार असून, त्यासाठी दोन कोटींचा खर्च आहे. यंदा पाऊस लांबल्यास धरणातील साठा उणे ६० टक्क्यांखाली गेल्यास सोलापूरचा पाणीपुरवठा १०-१२ दिवसाआड होऊ शकतो, अशी चिंता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याची संपूर्ण मदार उजनी धरणावरच अवलंबून आहे. शेतीसाठी कॅनॉल, बोगदा, उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडता येणार नाही, एवढी धरणाची पातळी खालावली आहे. याशिवाय इंदापूर, बारामती, धाराशिव, कर्जत-जामखेड या नगरपालिकांसह १०० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनाही उजनीचाच आधार आहे.

पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांसह औद्योगिक वसाहतींनाही उजनीतून पाणीपुरवठा होतो. मात्र, धरण उणे ६१ टक्के झाल्यानंतर धरणावरील ४७ पैकी बहुतेक पाणीपुरवठा योजना बंद पडतात. आतापर्यंत धरण २०१५-१६ मध्ये उणे ६० टक्क्यांपर्यंत खाली गेले होते, पण पाऊस कमी पडल्याने यंदा स्थिती चिंताजनक आहे. धरणातील साठा उणे ६० टक्क्यांवर पोचल्यास कोट्यवधींचा खर्च करूनही सोलापूर महापालिकेला दहा दिवसाआड पाणी देता येणार नाही. मेनंतर नदीतून पाणी सोडता येणार नाही आणि जलवाहिनीतूनही पाणी उपसा करण्यास अडचणी येतील, अशी सद्य:स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सध्यातरी पाणी जपून वापरण्याचाच पर्याय नागरिकांकडे शिल्लक आहे.

उजनीवर ४७ पाणीपुरवठा योजना

सोलापूर महापालिका, करमाळा, बार्शी-कुर्डुवाडी, इंदापूर, बारामती, धाराशिव, जामखेड नगरपालिका, व्होळे व २७ गावे, कव्हे व इतर १० गावे, जेऊर व २९ गावे, राशीन, ग्रामपंचायत अखोणी व २२ गावे, ग्रामपंचायत जिंती, ग्रामपंचायत केत्तूर नं. २, ग्रामपंचायत सावडी कोटी, ग्रामपंचायत भिगवण, ग्रामपंचायत शिरसोडी व दोन गावे, गागरगाव ग्रामपंचायत, देऊळगावराजा ग्रामपंचायत, श्री क्षेत्र सिद्धटेक देवस्थान ट्रस्ट सिद्धटेक (कर्जत), इंदापूर, देवळाली, कर्जत, टेंभुर्णी, नीरा-नरसिंहपूर, धनस्मृती टेक्स्टाईल प्रा.लि. झरे, नेचर डिलाईट प्रा.लि. कळस, भैरवनाथ शुगर प्रा. लि. आलेगाव, शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान, वनगळी, एनटीपीसी (आहेरवाडी), रे-नगर (कुंभारी), हरनेश्वर ॲग्रो लि. कळस (इंदापूर), बारामती ॲग्रो लि. (पिंपळी), अंबालिका शुगर (कर्जत), भैरवनाथ शुगर विहाळ (करमाळा), श्री मकाई साखर कारखाना (भिलारवाडी), बारामती, टेंभुर्णी, इंदापूर एमआयडीसी, श्री आदिनाथ साखर कारखाना (शेलगाव), इंदापूर साखर कारखाना (बिजवडी), बिल्ट ग्राफिक प्रा.लि. भादलवाडी (इंदापूर), व्यंकटेश्वरा हॅचरीज लि. खडकी (दौंड), श्री विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना (पिंपळनेर), पिंपळखुंटे ग्रामपंचायत (अंबड, ता. माढा).

धरणाची पातळी अन्‌ पाणीपुरवठ्याची स्थिती

  • योजना पाणी बंद होण्याची पातळी

  • नदी उणे ८० टक्क्यांपर्यंत

  • सांडवा ०० टक्के

  • वीजनिर्मिती ०० टक्के

  • कॅनॉल उणे ३२.३३ टक्के

  • बोगदा उणे २१ टक्के

  • सीना-माढा ०० टक्के

  • दहिगाव उणे २.९६ टक्के

  • सोलापूर शहर उणे ५५.८८ टक्के

  • एनटीपीसी उणे ६० टक्के

  • धाराशिव उणे ६१.७४ टक्के

सोलापूरसाठी तिबार पंपिंगनंतर पुढे काय?

उजनी धरण उणे ३० टक्क्यांवर गेल्यानंतर सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी एक ते सव्वाकोटींचा खर्च करून धरणात दुबार पंपिंग करावे लागते. सध्या दुबार पंपिंग सुरू झाले आहे. तर धरण उणे ५० टक्के झाल्यावर दोन कोटींचा खर्च करून तिबार पंपिंग करावे लागते. मात्र, धरणातील पातळी उणे ५६ ते ६० टक्क्यांपर्यंत खाली गेल्यावर या पंपिंगचा काहीही उपयोग होत नाही. आजवर अशी वेळ आलेली नाही, पण यंदा तशी वेळ आल्यास सोलापूर शहराला आठवड्यातून एकदाच पाणी मिळू शकते, अशी चिंता सतावू लागली आहे. दरम्यान, समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर धरणातील पंपिंग हाऊसमधून उणे ७० टक्क्यांपर्यंत पाणी उपसा करता येणार आहे. पण, त्यासाठी आणखी काही महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे.

सोलापुरातील ‘या’ भागात आता ५ दिवसाआड पाणी

उजनी धरणातील पाणी पातळी झपाट्याने खालावत असून, औज, हिप्परगा बंधाऱ्यातील पाणी देखील काही दिवसात संपत आहे. या पार्श्वभूमीवर आता सोमवारपासून (ता. १) नेहरूनगर, जुळे सोलापूर, नई जिंदगी, नीलमनगर, साईबाबा चौक, कर्णिकनगर, बापूजीनगर, एकतानगर, विकासनगर, गुरुनानक चौक परिसर, किनारा हॉटेल परिसर या भागाला पाच दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. पाऊस पडेपर्यंत अशीच स्थिती राहणार असून, पाऊस लांबल्यास संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा पाच दिवसाआड होणार आहे.

सोमवारपासून निम्म्या शहराला पाच दिवसाआड पाणी

औज बंधाऱ्यातील काही दिवसात संपणारे पाणी आणि उजनी धरणातील पाणीसाठा व महापालिकेचे दुबार पंपिंग, भविष्यात काही दिवसात सुरू करावे लागणारे तिबार पंपिंग, अशा सर्व बाबींमुळे पाऊस पडेपर्यंत निम्म्या शहराला सोमवारपासून पाच दिवसाआड पाणीपुरवठा होईल. धरण उणे ६० टक्क्यांवर गेल्यानंतर जलवाहिनीतून पाणी घेणे खूपच अडचणीचे होईल. त्यामुळे सर्वांनी पाणी जपून वापरावे.

- व्यंकटेश चौबे, सार्वजनिक आरोग्य अभियंता, महापालिका, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com