मोठी बातमी! उजनीतील पाणी आता पिण्यासाठीच राखीव; ‘सुपर एल निनो’मुळे पाऊस लांबणार; धरण उणे २१ टक्के, पाण्याचा निर्णय आता राज्य शासनाच्या हाती, वाचा...

मॉन्सूनचे महाराष्ट्रात आगमन साधारणपणे १० जून ते १५ जूनदरम्यान होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यावर्षी ‘सुपर एल निनो’च्या प्रभावामुळे राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असाही भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर उणे २१ टक्क्यांपर्यंत आलेल्या उजनी धरणातील पाणी आता पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
ujani dam, solapur

ujani dam, solapur

Canva
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : मॉन्सूनचे महाराष्ट्रात आगमन साधारणपणे १० जून ते १५ जूनदरम्यान होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यावर्षी ‘सुपर एल निनो’च्या प्रभावामुळे राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असाही भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर उणे २१ टक्क्यांपर्यंत आलेल्या उजनी धरणातील पाणी आता पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

गतवर्षीच्या पावसाने उजनी धरण १०० टक्के भरले होते. डिसेंबरअखेर धरणात ११३ टीएमसीपर्यंत पाणीसाठा होता. त्यावेळी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने आणखी एक उजनी भरेल इतके पाणी नदीद्वारे सोडून द्यावे लागले. यंदाच्या कडक उन्हाळ्यात उजनीतून शेतीसाठी सलग दोन महिने पाणी सोडले गेले. २३ एप्रिल रोजी भीमा नदीतही पाणी सोडण्यात आले. आता कालव्यांतून व नदीतून पाणी सोडणे बंद झाले आहे. करकंब परिसरातील कालव्यात उजनीचे पाणी सुरू आहे, पण १० जूननंतर धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे.

१ मे रोजी धरणात ५५.५७ टीएमसी मृत पाणीसाठा (उणे १५.११ टक्के) होता. ३१ मे रोजी धरणातील मृत पाणीसाठा ५२.४१ टीएमसीपर्यंत (उणे २१ टक्के) खाली आला आहे. कडक उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवनदेखील मोठ्या प्रमाणावर झाले आहे. सुपर एल निनोच्या प्रभावामुळे यंदाचा मॉन्सून लांबणीवर पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखून ठेवला जाणार आहे. भविष्यात पाऊस लांबल्यास भीमा नदीत पाणी सोडण्याची वेळ आल्यास त्याचा निर्णय राज्य शासन घेईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

आता पाण्याचा निर्णय राज्य शासनाच्या हाती

उजनी धरणातून २३ एप्रिलपासून भीमा नदीत पाणी सोडले. त्यापूर्वी कालव्यांद्वारे शेतीसाठी पाणी सोडले आहे. आता धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव राहील. धरण उणे २१ टक्क्यांवर गेल्याने कालव्यातून पाणी सोडता येणार नाही. पुढे नदीतून पाणी सोडण्याचा निर्णय राज्य शासनामार्फतच होईल.

- एस. एस. खांडेकर, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर

उजनी धरणातील सद्यस्थिती

  • सध्याचा पाणीसाठा : ५२.४० टीएमसी

  • पाण्याची टक्केवारी : उणे २१ टक्के

  • गतवर्षी पाणीसाठा : उणे २३ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com